सक्षम ला घडवतांना मला काय वेगळा अनुभव येतोय हे आज मी शब्द रूपाने उतरवण्याचा प्रयत्न करते आहे . जगापेक्षा वेगळी वाट निवडलीय खरी ,चालायला आम्ही सज्ज पण आहोत पण हि वाट नेमकी कुठे पोहचवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पण छान वाटतोय हा प्रवास ... तुम्ही कधी केलय असं ? ध्येय किती दूर आहे ,कुठे थांबायचं हे माहित नसताना चालत राहणे.करून पहा मज्जा येईल आयुष्यात. आमच्याबाबतीत हेच होतंय . आजूबाजूचा आई हा वर्ग मुलांना सकाळी उठवणे , दप्तर तयार करणे,डब्बा भरणे,स्कूल बस पर्यंत जाऊन टाटा करून येणे , दुपारी बस ची वाट बघणे , होम वर्क करून घेणे किंवा स्वतःच करणे....... डब्बा संपवला नाही म्हणून ओरडाओरडी ,वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवणे ... हुश्श !! ह्यामध्ये धावतांना दिसतात .पण माझ्याबतीत हे काहीच घडत नाहीय . कारण स्कूल ह्या विषयापासून मी आणि सक्षम खूप दूर आहोत. आमचा दिवस तो उठेल तेव्हा चालू होतो . सकाळी लवकरच उठाव असा माझा आग्रह नाही. पण तो त्याची झोप पूर्ण करून वेळेतच उठतो. सकाळची थंड हवा अंगावर घेऊन मोकळ्या मैदानात चक्कर मारून प्रसन्न सूर्योदय बघत बघत आमच्या अखंड उत्साहपूर्ण दिवसाची सुरवात होते. निसर्गाच्या शाळेपुढे मला बाकडे टाकलेली चार भिंतीची बंद शाळा ठेंगणी वाटते. आणि विशेष म्हणजे आम्ही एका शाळेसमोरूनच हिंडत फिरत जात असतो. माझ्या घराच्या बालकनीतून थोडं दूर बघितलं कि शाळेचं तेच तेच चित्र रोज दिसत. ठराविक वेळेला वातानुकूलित ,उत्तम दर्जा असलेल्या बसेस गेटसमोर येऊन थांबतात , सगळी मुले रांगेत उतरून आपापल्या वर्गामध्ये प्रवेश करतात,आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ६ तास घड्याळीच्या ठोक्याप्रमाणे यंत्रवत चालू असतात , त्या शाळेमध्ये प्रत्येक स्पोर्ट्स साठी क्लब हाऊस आहे. एकदम उत्तम !!!यामध्ये वादच नाही आणि का असू नये पालकांकडून घेतल्या गेलेल्या फीसमधून एवढं समृद्ध ठेवणं आवश्यक आहे.पण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन ,स्विमिन्ग पूल मध्ये नुकताच हात पाय मारायला शिकलेला तो छोटा मुलगा ,अजून आनंद घ्यावा असं वाटलं तरीही घड्याळात ठोका वाजतो ,कारण त्याला संगीतावर ठेका धरायला जायचं असत. ह्याच शाळेमध्ये संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त इतर मुलांसाठी स्विमिन्ग पूल ओपन असतो , सक्षम आणि माझी हझरी तेव्हा तिथे लागते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे स्वच्छंद सोडल्यानंतर त्याची प्रगती लवकर होते आहे. अक्षरांच्या ओळख बाबतीतही बोलायचं झालं तर ,जी मुले वयाच्या ५ वर्षी वाचायला शिकतात माझा मुलगा कदाचित उशिरा शिकेल ह्याच दुःख अजिबात नाही पण तो स्वतः धडपड करत शिकेल ,अनुभवातून त्याच तो शिकेल ,ह्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं काही नाही .मी फक्त त्याच्यासाठी एक माध्यम आहे. १२ वय वर्षी वाचायला शिकलेला एक मुलगा वयाच्या १४ वय वर्षी एका मासिकाचा संपादक म्हणून काम करू शकतो,असेहि कुठेतरी वाचनात आलय.नैसर्गिकपणे शिक्षण हे केव्हाही उत्तम . माझी कुठल्याही शाळेवर टीका नाही ,आपल्या मुलाला शाळेत टाकावं किंवा टाकू नये असा माझा कोणाला आग्रहही नाही. हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे . सगळेच जण प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतात असही नाही. फक्त एका मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेल्या आईच्या चष्म्यातून स्कूल ते होमस्कूल आणि या गोष्टीकडे कसं बघावं हाच दृष्टिकोन ठेऊन मी लिहत आहे.
मी स्वतः कॉलेजमध्ये जेव्हा ठराविक तासाला ठराविक शिकवायचं असा ठोकताळा स्वतःशी बांधून जाते तेव्हाच lecture आणि स्वछंद ,ठरवून न घेतलेलं lecture ह्यामध्ये खूप अंतर मला जाणवते. चौकट आखून घेतली कि काही गोष्टींना सीमा राहते . अभिव्यक्ती स्वतंत्र हाच मुळात शिक्षणाचा पाया आहे. आपण काय शिकतोय ह्यापेक्षा कस शिकतोय हे खूप महत्वाचं आहे. शिकण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम वर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्याला क्षितिज च शिकण्यासाठी अंत असू शकतो . कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होणं किंवा एखादी डिग्री मिळवणं हे समाधानी आयुष्य जगण्यासाठी कारण असू शकत नाही. शिक्षणातली उच्च पदवी मिळवण्याकरिता मी सध्या संशोधन करतेय ,पण मला प्रासंगिक उद्भवलेल्या प्रश्नावर तोडगा काढता येईल का ???हा मला बरेचदा पडलेला प्रश आणि त्यावर न सुचलेलं उत्तर !!!! बालपण म्हणजे एक निरागस जगणं आहे. ध्येय गाठण्यासाठी त्याला स्पर्धेच्या शृंखलेत न अडकवता तिथपर्यंत जात असलेली वाट ,प्रवास अनुभवता यावा . हि प्रामाणिक इच्छा . किती सुंदर असेल तो प्रवास जेव्हा मुक्कामच असेल तुमचा खरा प्रवास !!!