Tuesday 13 October 2020

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.( शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.(  श्री शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )


आयुष्यात एक प्राथमिक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःला काय आवडतं हे जाणून त्यामध्येच वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही. . त्यांनी केलेले मार्गदर्शन हे समाजातील युवक पिढी साठी खूप महत्वाचे आहे. एक सुदृढ पिढी व्यवसायात उतरावी आणि स्वतः बरोबर समाजाची प्रगती व्हावी ह्यासाठी त्यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत . अतिशय सुंदर आणि सोप्या शैलीत आपले म्हणणे मांडण्याची श्री शिरीष भाऊंची पद्धत वाखाणण्यासारखी आहे . ज्याप्रमाणे नदी समुद्राला जाऊन मिळते आणि आपला रस्ता स्वतः निर्माण करते   त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक श्री शिरीष शांतीकुमार खंडारे ,औरंगाबाद ह्यांनी आपला व्यवसायचा रस्ता स्वतः निर्माण करून  त्याचबरोबर "हाय टेक" चा ठसा सर्वत्र उमटवला. नदीच्या प्रवासावर हिंदी कवी श्री प्रमोद तिवारी ह्यांनी  लिहलेल्या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात  



प्रचलित गतियों से बचना

अपना पथ खुद ही रचना

अपनी रचना में तुमको छलकेंगी गंगा जमुना

अपना पथ अपना होगा,अपना रथ अपना होगा

अपनीही होगी फिर रफ़्तार

अपनी कश्ती........  अपनी पतवार, नदिया

धीरे धीरे बहना नदिया घाट घाट से कहना


१) आपल्या व्यवसायाची कल्पना आपल्याला कशी सुचली ?

- स्वतःचा व्यवसाय करायचा हे इंजिनीरिंग करतांना डोक्यात होते परंतु नक्की काय करायचे हे माहिती नव्हते .औरंगाबाद शहर सोडायचे नाही हे माझे निश्चित होते.  आजोळी मामांचा व्यवसाय मी लहानपणा पासून बघत होतो. पालकांकडून व्यवसाय चालू करण्यासाठी पूर्ण पाठिंबा होता. परंतु नक्की काय करता येईल ह्याची दिशा ठरत नव्हती. दीड वर्ष  मी औरंगाबादला बजाज ऑटो मध्ये नोकरी केली, तिथे कर्मचारी वर्गाचा संप सुरु होता त्यामुळे सामान उचलण्यापासून ते कस्टमर ला पोहचवण्यापर्यंतचे काम मला करावे लागत होते. पण इतका सगळा अनुभव गाठीशी पडला हे मला चांगलेच फावले. नोकरी करत असताना मला खूप चांगली संधी चालून आली. मला अशी पोस्ट मिळणार होती ज्यासाठी लोकांना १०-१० वर्षे वाट पहावी लागली असती, पण ते नाकारून मला स्वतःच व्यवसायच करायचा आहे असे मी ठाम ठरवले होते. एम बी ए करतांना एका मित्रासोबत नवीन व्यवसाय करण्याच्या कल्पना जुळून आल्या आणि "हाय टेक" च्या प्रवासाला सुरवात झाली .


२) उद्योजक होण्यासाठी आपली मुख्य प्रेरणा शक्ती कोणती होती?

माझ्याकडे आईचे सगळेच भाऊ व्यवसायात होते त्यामुळे मी लहानपानपासून ते बघतच होतो तसेच बाबांची शिस्त प्रियता आणि काटकसर हे माझ्या व्यवसायाच्या सुरवातीला खूप मोलाचे ठरले. बाबा मला त्यांच्यासमोर बसवून व्यवसायात गुंतवलेला पैसा काढायचा नाही किंवा होणार खर्च हा कर्ज काढून फेडायचा नाही असे एक ना अनेक अनमोल धडे देत होते.. मी माझा व्यवसाय चालू केला तेव्हा ते रोज संध्याकाळी मला दिवसभराचा आढावा विचारत असे .सगळे व्यवहार पारदर्शक ठेवण्याबाबतीत त्यांचा कटाक्ष असायचा. चैनीच्या गोष्टी वर पैसा खर्च करणे हे त्यांना पटत नसे. मला दिलेल्या पॉकेट मनी मधूनच माझी कपडे ,सिनेमा , सहली ह्या गरजा पूर्ण करायच्या वरखर्च बाबांकडून मिळत नसे त्यामुळे एक काटकसर करण्याची सवय मनाला लागली .  उधार घेतलेले पैसे हे बचत मधून  फेडता यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त उधारी करायची नाही हि शिस्त खूप उपयोगी पडली. व्यवसायात गेलेली गुंतवणूक आम्ही अजूनही वैयत्तिक कामासाठी वापरत नाही खूपच निकडीचे प्रसंग उद्भवला तरच ती वापरण्यात येते त्याची परतफेड हि कालांतराने केली जाते. हि बाबांनी शिकवलेली शिस्त व्यवसायात खूप उपयोगी पडली. माझे बाबा  माझे प्रेरणा स्रोत होते


3) आपण आपल्या कंपनीचे नाव  "हाय टेक"कश्यावरुन ठेवले? 

कंपनीचे नाव ठेवण्यामागे एकच उद्देश होता आपण जे मार्केट मध्ये उत्पादन देतोय ते ह्या नावावरून ओळखले जावे. ह्या नावातून लोकांना परिचय व्हावा. आम्ही आमचे उत्पादन हे दारोदारी जाऊन न विकता कस्टमर च्या प्रश्नाला गुणवत्ता पूर्वक उपाय सुचवणे हेच आमचे ध्येय आहे त्यामुळे हाय -टेक ह्या छताच्या खाली आमच्या अनेक कंपन्या चालतात.माझ्याकडे भांडवल खूप नसल्यामुळे मी उत्पादन करू शकत नव्हतो म्हणून मी ट्रेडिंग पासून सुरवात केली .माझ्या कौशल्याचा पूर्णतः उपयोग व्हावा असे मला काहीतरी सुरु करायचे होते. सगळ्यात पहिली कंपनी हाय टेक एंटरप्राइज म्हणून निर्माण झाली. कस्टमरला आलेल्या कुठल्याही समस्येचे निराकरण करणे आणि नवीन येणारे तंत्रज्ञान वापरून त्याला सोडवणे ह्यालाच कन्सेप्ट सेल्लिंग असे म्हणतात हे आम्ही मुख्यकरून करतो . ह्यासाठी बाजारात येणारे नवीन नवीन तंत्रज्ञान आम्ही अमलात आणतो आणि  कालांतराने कालबाह्य झालेले तंत्रज्ञान आम्ही काढून टाकतो.  हाय टेक कंपनी  सोलुशन देणे तथा कन्सेप्ट सेल्लिंग ह्या नावाने मार्केट मध्ये नावाजलेली गेली . माझ्या कंपनीचे स्वरूप समजणे हे थोडे अवघड आहे . कारण आम्ही प्रॉडक्ट विकत नाही . 


४) आपल्या कंपनीसाठी आपण निधी कसा वाढवला?

मी नोकरी करत असताना माझी मासिक आय १२५० रुपये होती. ते पैसे मी जमा करत होतो. लग्न होईपर्यंत बाबांकडून मला मासिक पॉकेटमनी १०० रुपये मिळत होता तेच पैसे मग मी महिन्यातून एक दोन सिनेमा किंवा कधी कधी डोसा खाण्यात घालवीत असे तसेच वर्षभरात काही ड्रेस मी ह्याच पॉकेट मनी मधून विकत घेत  होतो . २४,००० रुपये, हि व्यवसायात केलेली माझी पहिली गुंतवणूक माझ्या जमा खर्चातून आली होती.आजही आम्ही कंपनीचे पैसे वेतन म्हणून  उचलतो . कालांतराने ही वेतनराशी वाढत गेली एवढेच पण व्यवसायामध्ये गुंतवलेला आणि झालेला नफा आम्ही त्यातच गुंतवतो . आजच्या तारखेला माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर १५० करोड एवढा आहे. हा इथपर्यंत पोहचण्यासाठी मला बरेच वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. 


५) आपल्या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची संस्कृती अस्तित्वात आहे आणि आपण ती कशी स्थापित केली?

आमच्याकडे मुक्त आणि पारदर्शक कार्य पद्धती आहे. अगदी लोवर स्टाफ सुद्धा माझ्यापर्यंत विनाप्रयास पोहचू शकतो. जिथे जिथे समस्या आली  तिथे तिथे मी स्वतः जाऊन ते प्रश्न सोडवतो किंवा स्टाफ ला प्रोत्साहन देतो. एका परिवार मधील सदस्य म्हणून आम्ही सगळे वावरतो. बरेचदा स्टाफ च्या खाजगी समारंभाला मी स्वतः सहपरिवार हजेरी लावतो परंतु आता कामाच्या व्यापात हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. एकंदर निरोगी असे वातावरण आपल्या कंपनी मध्ये आहे.आमच्या काही सहली जातात तसेच कर्मचारीसाठी लागणारे इन्शुरन्स आम्ही देतो. कंपनीच्या turn ओव्हर हा सुद्धा सगळ्या कर्मचारी ला माहिती असतो कोणापासून काहीही लपवून ठेवलं जात नाही . 


६) उद्योजक असण्याने आपल्या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे?आपल्या दिवसाचे नियोजन काय असते ?

एक उद्योजक म्हणून मलाही परिवारासाठी पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही ह्यासाठी मी माझी धर्मपत्नी सौ. नीता खंडारे हिला श्रेय देऊ इच्छितो. मी जर ठरवलं असतं की मला १० ते ५ ची नोकरी करून आनंदी आयुष्य जगायचं आहे तर माझ्यामधील कर्तृत्व मी कधीच बाहेर काढू शकलो नसतो. मी कधीही पैसा हे लक्ष ठेऊन काम केलं नाही . मला कामावर प्रेम होत आणि मी ते करत गेलो पैसा हा त्याबरोबर  मिळत गेला. त्यामुळे हे सगळं उभं करतांना थोड्याफार प्रमाणात माझ्या परिवाराला कष्ट सहन करावे लागले हे मी नाकारू शकत नाही.कॉलेज मधील दिवसांपासून मी लवकर उठतो . सकाळचा १ घंट्याचा वेळ हा माझा वेळ असतो ज्यामध्ये मी फिटनेस संबंधी क्रिया करतो. सकाळचा वेळ मुलांसोबत आणि परिवारासोबत घालवतो जेवण करून १०:३० पर्यंत ऑफिस ला पोहचतो . जवळपास १० ते १२ तास काम मी अजूनही करतो . गेली २0 वर्ष रविवार हा माझ्यासाठी,परिवारासाठी  मी राखून ठेवलेला दिवस आहे . ह्यादिवशी ऑफिस संबंधी कुठलहि काम मी करत नाही.

माझ्या यशामध्ये माझी पत्नी नीता खंडारे हिचा मोलाचा वाटा  आहे . सौ नीता ह्यांनी  बी कॉम ची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. लग्नानंतर २ वर्षांनी एम कॉम ला ऍडमिशन घेऊन मराठवाडा विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले आहे. मुले मोठी झाल्यानंतर एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीचा अनुभव घेऊन त्या आता स्वतःच्या दोन शाळा औरंगाबाद इथे चालवतात . पूर्ण दिवस वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी शाळा प्री स्कूल पर्यंतच मर्यदित ठेवली आहे. तसेच माझी मुलगी शौरी हिने बी टेक एम बी ए ची पदवीधर शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे आणि एक कर्मचारी म्हणूनच ती आता मला कंपनीच्या कामात मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करते आहे . माझा मुलगा सोम हा नुकताच १० ची परीक्षा ९४. २ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला आहे. पैंटिंग हा छंद सांभाळत तो पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे  



७)आपल्या कंपनीच्या इतर कुठे कुठे शाखा आहेत?त्या आपण कशा व्यस्थापित करता?

सुरवातीपासून माझे असे धोरण होते की सगळे स्वतः करण्यापेक्षा काम वाटली गेली पाहिजे आणि त्या कामांचे हक्क आणि जबाबदारी त्या व्यक्ती कडे पूर्णतः असली पाहिजे त्यामुळे खूप लोक जोडली गेली .त्यामुळेच मी माझ्या कंपनीचा विस्तार करू शकलो . सगळीकडे मीच धावायचं असे जर झाले असते तर कंपनीचा सर्वांगीण विकास हा मला शक्य झाला नसता . औरंगाबाद सोडून पुणे ,नाशिक,बंगलोर तसेच उत्तरांचल मधील रौद्रपूर इथे आमची कंपनी ची शाखा आहेत . मी स्वतः तिथे महिन्यातून एकदा किंवा काही ठराविक काळानंतर भेट देतो तिथले सगळे व्यस्थापन तिथली स्थानिक टीम पार पडते . तिथला सगळा  आढावा माझ्यापर्यंत पोहचतो . आणि मी औरंगाबाद च्या ऑफिस मधून सगळे व्यवस्थापन करतो. 


८) आपली सर्वात मोठी भीती काय आहे आणि आपण भीतीचे व्यवस्थापन कसे करता?

व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी असतो . त्या वेळामध्ये नात्यागोत्यातील काही समारंभला हजेरी लावणे, फॅमिली साठी वेळ देणे मित्रांना भेटणे, नातेवाईकांकडे जाणे हे सगळे बसवणे अवघड होते. त्यामुळे सगळ्यानांच न्याय देणे शक्य होत नाही. ह्या गोष्टीसाठी मला किंवा इतर माझ्या आप्त लोकांना त्रास सहन करावा लागतो.नातेवाईक, मित्र की व्यवसाय ह्यामधून एक निवडणे हे खूप कठीण असतं. जो निर्णय मला सर्व बाजूनी योग्य वाटतो तो मी घेतो, तसे अमलात आणतो. वेळेचं यवस्थापन करणे आणि सगळ्या गोष्टींना न्याय देणे ही माझ्यासाठी भीती ची एक गोष्ट ठरते .


९) आपले आदर्श काय आहेत?

आदर्श म्हणायचे झाले तर काटकसर आणि शिस्त ह्यामध्ये माझे बाबा माझे आदर्श आहेत त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. माझे सासरे ह्यांच्याकडून मी उत्साह टिकवायचा कसा हे शिकलो आणि बरीच पुस्तक त्यामध्ये रतन टाटा ह्यांचे आत्मचरित्र, महाभारत असा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल.माझ्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा पुस्तकांचा आहे. मी आजही माझ्या लायब्ररी मध्ये नवीन नवीन पुस्तके ठेवतो हा कोरोनाचा कालावधी माझ्यासाठी नवीन शिकण्याची ,नवीन पुस्तके वाचण्याची संधी घेऊन आला होता . सोशल मीडिया वर असणारे फायनान्स , राजकारण , व्यवस्थापन ह्या संबंधी चे बरेच व्हिडीओ मी बघितले त्यामधून शिकलो . शिव खेरा , टी .टी रंगराजन , अनिल लांबा ह्यांची पुस्तके मला सगळ्यात जास्त प्रोत्साहित करतात . स्वतःला उत्साहित ठेवण्यामध्ये मला पुस्तकांची खूप मदत होते . शिकण्यासाठी कधीही थांबायचं नाही  हा माझा मूलमंत्र आहे 


१०) यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही प्रकारची पद्धत किंवा सूत्र आहे जो आपण सर्वांना सांगू इच्छिता?

मी दिवसभर जे काम करतो ते एकच लक्ष ठरवून करतो काम झाल्यावर मनाला शांतता मिळायला पाहिजे आणि काम केल्याचा आनंदही .माझे मन नेहमीच  काहीतरी नवीन करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी धडपडत असते आणि त्यामुळे मला ह्या व्यवसायामध्ये स्थिर राहण्यासाठी बळ मिळत गेलं, आजही मी माझा उत्साह टिकवून आहे .मला काम करण्याचा दबाव हा कधी वाटला नाही मी माझे काम मनापासून जगतो . मी  शासकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे रोबोकॉन नावाची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते तिथल्या मुलांना लागणारे सर्व साहित्य आणि मार्गदर्शन हे मी माझ्या कंपनी कडून दरवर्षी करतो . आणि पहिल्या तीन मध्ये ही टीम बक्षीस जिंकत आली आहे. समाजातील कुठल्याही मुलाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास मी कधीही मार्गदर्शन करायला तयार आहे. 


११) व्यवसायातील आपला सर्वात समाधानी क्षण कोणता आहे?

एक सगळ्यात मोठ्या कंपनी कडून मला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता जी बाजारात एक नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते तसेच ह्या जानेवारी मध्ये इकॉनॉमिक टाइम्स मधून भारतात असणाऱ्या १०८ ग्रोविंग (growing) कंपनी मध्ये नामांकन झाले होते तो आमच्या सगळ्यांसाठीच एक अद्भुत क्षण होता.हा अवॉर्ड मिळाला त्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती एक दिवस अचानक एक मेल इनबॉक्स मध्ये आला ,आजकाल खोटे मेल बरेच येतात म्हणून दुर्लक्षच केलं पण सहज इकॉनॉमिक टाइम्स च्या वेबसाईट वर बघतिलयावरच खात्री पटली . स्टॅटीस्टिका नावाची एक जागतिक कंपनी आहे ती सगळ्या बिसनेस चा रेकॉर्ड गोळा करते ज्यामध्ये कस्टमर कडून घेतलेला फीडबॅक ला जास्त प्राधान्य दिले जाते आणि मग नामांकन ठरते . हि प्रक्रिया बरीच बारकाईने केली जाते हे आम्हाला नंतर कळले.  त्यांच्या पातळीवर उतरणे हि एक अवघड बाब होती पण आमची कंपनी नामांकित झाली हि खरंच एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली  असे वाटते. 


१२) यशस्वी उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन पदवीधरांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?

कुठल्याही व्यवसायामध्ये सफल होण्यासाठी  मेहनत ,प्रामाणिकपणा आणि उत्साह ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत असे मला वाटते. जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि कुठल्याही गोष्टीसाठी शॉर्टकट हा नसतोच . जर तुम्हाला असं आढळल कि एखादी गोष्ट मेहनत न करता मिळतेय किंवा फुकट मिळते आहे म्हणजे समजावं त्या गोष्टीत काहीतरी गडबड आहे. हार्ड वर्क आणि त्याचबरोबर स्मार्ट वर्क हा यशस्वी होण्याचा  मूलमंत्र असू शकतो .सगळ्यात महत्वाचा सल्ला मला द्यावा  वाटतो तो म्हणजे मेहनतीला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्या आरोग्यापेक्षा मोठी असू शकत नाही ."जान है तो जहाँन है ". आरोग्याशी  तडजोड करून काहीही मिळवू शकत नाही. व्यायाम, योगा, प्राणायाम आणि योग्य आहार याकडे दुर्लक्ष करू नका.


१३) जगभ्रमंती ह्याबद्दल तुमचे काय मत आहे ?तुम्ही कुठे कुठे फिरून आला आहात ?

सहल आणि जगभ्रमण करणे हा  आमच्या  परिवाराचा आवडता छंदच आहे.  मी आई बाबांसोबत धार्मिक सहली ला बरेचदा जात होतो . कंपनीच्या निमित्ताने आता बरेच जग स्वतः पहिले आहे . कुठेही गेलो तरी आम्ही तिथे फिरण्यासाठी लोकल साधनांचा वापर करतो जेणेकरून तिथली संस्कृती जवळून बघता यावी. मागे चीन ला गेलो तेव्हा तिथल्या लोकांची कार्यक्षमता पाहून मी भारावून गेलो . जगात कुठेही गेलो तरी मला तिथले कामाचे क्षेत्र ,तिथली संस्कृती अभ्यास करायला आवडते आणि ती आपल्याला भारतात आणता येईल का ह्याची मी आवर्जून दखल घेतो . मी पूर्ण यूरोप फिरलो आहे ,चीन जपान ,कोरिया ,थायलंड ,मलेशिया असे अनेक देशात मी भ्रमण  केले आहे.माझा जगभ्रमंतीचा अनुभव उल्लेख करतांना मला चीन चा अनुभव नमूद करावासा वाटतो , तिथे शाकाहारी जेवण मिळवणे हे सगळ्यात अवघड काम होते मी रोज माझ्यासोबत आणलेला नास्ता हॉटेल मध्ये बनवून खात होतो ऑफिस मधील एक सहकारी मला रोज जेवणासाठी विचारात होता पण मी फक्त फळे आणि जूस घेतो हे त्याला लक्षात आले. त्यानी मला शाकाहारी जेवण मिळावं  म्हणून खूप प्रयत्न केले .आणि एक बुद्ध लोकांचा समूह होता जो वेगान होता तिथून माझ्यासाठी जेवण मागवून आणले. 


१४)कंपनी मध्ये इतके लोक काम करतात त्यापैकी कधी वाईट अनुभव आले का ?

तसे खूप वाईट अनुभव कधी आले नाहीत ह्याला कारण म्हणजे मी दाखवलेला विश्वास . तरीही काही ओळखीची लोक मला  असे भेटले ज्यांनी माझ्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतला . एक जरुरत असलेल्या युवक तरुणाला मी कंपनी मध्ये ठेऊन घेतले होते त्याचा कामाचा परफॉर्मन्स हा चांगला नव्हता तरीही आज ना उद्या सुधारेल म्हणून मी त्याला शिकवत गेलो पण काही दिवसांनी मला त्याचा   कंपनी सोडून जातोय असा एकई-मेल आला आणि काही दिवसात समजले कि तो आपल्या स्पर्धक असलेल्या कंपनी साठी नोकरी करतोय . ह्या घडणाऱ्या गोष्टींवरून विश्वास ठेवण्यात मी स्वतःला आणि येणाऱ्या कर्मचारीला पारखून घ्यायला शिकलो. 


१५) आपल्या समाजातील मुलांचा कल  हा स्वतःचा व्यवसाय न करता नोकरी कडे जास्त आहे ह्या संबंधी आपले काय मत आहे?

हो , हे खरं आहे . एक म्हणजे मेहनत करायला आजची पिढी तयार नसते आणि गावात राहिलो तर मुलगी मिळणार नाही भीती जास्त असते. मला मुलांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना सल्ला द्यावासा वाटतो की जर तुमच्या मुलाची व्यवसाय करण्याची तयारी असेल तर त्याला प्रोत्साहन द्या जास्तीत जास्त काय होईल की थोडेफार पैस्यांचे नुकसान होईल पण त्याला एक प्रयत्न नक्की करू द्या त्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे ठरेल . त्याचबरोबर शहरात जाऊन कमी वेतन ची नोकरी करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा गावामध्ये स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या मुलाला मुलगी द्या. हि मानसिकता बदलणे आज समाजासाठी खूप आवश्यक आहे . 


-पूजा वैभव परतवार 

(खराडी, पुणे )

9766426536

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...