Wednesday 27 November 2013

मुलांमध्ये फरक पडतोय ……. नक्कीच!

मुलांवर चांगले संस्कार करण्याचा अट्टाहास आजीने चालू केला होता . आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे "तुम्हाला मुलांना चांगले वळण लावता येत नाही " असे आजीने आल्यापासून कित्येकदा तरी ऐकवले होते. आजपासून मुलांना वळण लावण्याची जबाबदारी माझी अस म्हणून आजी पदर खोचून लगेच कामाला लागल्या . या एका महिन्यात मी सगळ्या घरातले डबे , बरण्या , ताट ,चमचे , वाटी ,पेले , चादरी , कपाट ,झाडं , कुंड्या ,माणसं आणि ,मुले ह्या सगळ्यांना चकचकीत करून सोडेल असे आजीने ठरवलेले आहे त्यामुळे आई आणि बाबांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची आणि दुरूनच गंमत  पहावी असा निश्चय करण्याचे धाडस केले.

पहाटेपासूनच आजीची स्वयंपाकघरात लगबग चालू झाली . थालीपीठ आणि दह्याची चटणी ह्याचा नाश्त्यासाठी बेत केला होता पण आईची कुठलीही मदत मला नकोय आणि माझ्या  स्वयंपाक करण्याचा वेग हे पटवून देण्यामध्ये बाबांच्या ऑफिसची आणि मुलांच्या स्कूल बसची वेळ झाली शेवटी पोह्यांवर समाधान मानून आई बाबा ऑफिसला आणि मुल शाळेसाठी बाहेर पडली . पण आजी पण   हार मानणाऱ्यापैकी   नव्हती . मुलांना शाळेतून आल्यावर तरी खायला मिळेल म्हणून आजीनी सगळ्या भाज्यांचं थालीपीठ  केलच , आल्यावर अस थालीपीठ कधीच खायला मिळाल नाही अस म्हणून मुल कशी हुरळून जातील ह्याचा विचार आजी मनात करू लागली . जेवणानंतर आपण ह्यांना कुठली गोष्ट सांगायची सोनपरी , माकड आणि टोपीवाला कि भोपळा आणि म्हातारी ,आवडती नावडती राणी अशा वेगवेगळ्या गोष्ट्यांची जुळवाजुळव आजीनी चालू केली . मुल छान  गालावर हात टेकून गोष्ट ऐकत आहे आणि तिकडल्या (आईच्या माहेरच्या ) आजीपेक्षा तू किती छान  छान  गोष्टी सांगते म्हणून "परत सांग ना " म्हणून छडा लावत आहे अश्या रम्य कल्पना आजीनी स्वतःशीच केल्या,  मुल शाळेतून परतली , सगळ आवरून जेवणाच्या टेबलवर आली ,  आजीने दोघांनाही गरम गरम थालीपीठ करून वाढले , "ए आजी हे तर पिझ्झा सारखच लागतंय डॉमिनोझ    आणि पिझ्झा हट मध्ये मिळतो अगदी तसाच तिथे तर त्याच्यासोबत कोक पण फ्री देतात पण तुला spongy करता आला नाही " अस म्हणून मुलांनी समोरचा पिझ्झा संपवला . आजीला एवढ्या मेह्नीतेने केलेल्या थालीपीठाला पिझ्झा म्हणावं हे काही फारस रुचल नाही !
 
टी व्ही समोरचा रीमोट घेऊन दोघेही सोफ्यावर आडवी झाली , पण तुम्हाला गोष्ट सांगते म्हणून मुल नको नको म्हणत असताना देखील आजीने दोन्ही कार्ट्यांना टी व्ही बंद करायला लावला . कारण ह्या पोरांना वळण आपणच लावू शकतो असा आजींचा (गैर )समज होता . 
" कुठली गोष्ट ऐकायची?  "     आजीचा प्रश्न   
" डोरेमोन $$$$ "                मुल ओरडली . 



आजी :"हा कोण?  " अस मनात म्हणून आणि मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करून आजीने "म्हातारी आणि भोपळा " ची गोष्ट सांगायला सुरवात केली . 
"एका म्हातारीला लेकीला भेटायला जायचं होत .वाटेत खूप घनदाट जंगल होत . जंगलात वाघ , कोल्हा ,तरस असे प्राणी रहात होते , म्हणून आजीने एक मोठा भोपळा घेतला आणि त्यात बसली भोपळ्याला म्हणाली "लेकीकडे जाईन तूप रोटी खाईल … चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "    आजी
"काहीपण काय आजी …! त्यापेक्षा जीप्सीने गेली असती म्हातारी त लवकर पोहचली असती आम्ही ट्रीपला गेलो तेव्हा जिप्सीतून फिरलो वाघ पाहायला  …. इई भोपळ्यात काय बसून जायचं ! "मुलांनी आजीला चूप केल आणि Tom & Jerry बघू लागले  

संध्याकाळी आई बाबा घरी आले , दुसरया दिवशी मुलांच्या शाळेत पालकसभा होती म्हणून आईने सुट्टी घेतली होती, पण "मी जाते मुलांच्या शाळेत, बघते शिक्षकांना तरी जमत का मुलांना वळण लावायला "असा पवित्रा आजीने घेतल्यामुळे आईला सुट्टी रद्द करावी लागली आणि पालकसभेत आजीची हजेरी लागली . "गणितातले प्रोब्लेम सोडवण्याच्या tricks , ईग्रजी बोलण सुधारण्याकरिता क्लास्सेस ची यादी , मुलांची personality development  असे अनेक अगम्य विषयाची चर्चा झाल्यावर पालकसभा संपली . "आमच्या वेळी नव्हत बाई असलं काही ……………। " असा उद्गार काढून आजी परतल्या  .
एका महिन्यात आपण कस सगळ चकचकीत करून दाखवतो म्हणून आजीने माळ्यावरचे डब्बे धुवायला काढले ,आणि स्टुलावरून पाय घसरला ! हाय हाय ………… असा उद्गार काढून आजी मटकन खालीच बसल्या . आई बाबांनी तातडीने आजीला डॉक्टरकडे नेल . पायाला प्लास्टर लागल होत दोघांनीही सुट्टी काढून आजीची सेवा केली ,आता गोष्ट ऐकायची वेळ आजीवर आली होती , मुलांनी पण दोरेमोन ,स्पायडर म्यन च्या गोष्टी सांगून आजीची करमणूक केली . 
तेव्हामात्र आजीला  आजोबांचे वाक्य आठवल्याशिवाय राहिले नाही " तू खूप दिवसांनी  पोराकडे जातेय त्यांच्या संसारामध्ये उगाच लुडबुड करू नको , आपली पिढी आणि त्यांची पिढी ह्यामध्ये बराच फरक पडलाय , ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांना परिस्तिथी ने बद्वालय , आपल्याला जर त्यांच्याशी जुळवून घ्याच असेल तर बदल आपल्यात करावा लागेल वळण आपल्याला बदलाव लागेल "
असा विचार करून आजी मुलांसोबत tom & jerry च्या fights एन्जोय करू लागल्या    

Tuesday 19 November 2013

निसर्गाचं आणि त्यासोबत समाजाचं बदलत रूप …………….

लहानपणी शाळेत शिकवलेले तीन ऋतू आठवतात . उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा त्यापैकी प्रत्येक ऋतू हा चार महिने असायचा आणि प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत होती . त्यातला उन्हाळा म्हणजे कडक उन्ह दुपारी घराच्या बाहेर निघायचं नाही ,पण शाळेला लागलेल्या सुट्या ,घरात जमलेले भावंड त्यांच्यासोबत मांडलेले पत्यांचे डाव , थंडगार कैरीचे पन्हे ,आंब्याचा केशरी रस,आजीची कुरोड्या पापडाची लगबग ,संध्याकाळी अंगणात पाणी टाकल्यावर येणाऱ्या वाफा हे सगळ छान  चित्र उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर उभं राहतं . पण माणसाच्या लालची आणि हेखेखोर स्वभावामुळे निसर्गाच सगळच चित्र पालटल्या सारख दिसतय . आता यंदाच्या उन्हाळा तर जणू सुर्य आग ओकतोय  शाळेला सुट्या लागल्या तरी लहान मुलं कुठल्यातरी उन्हाळी शिबिराला गळ्यात bag अडकून जातांना दिसताय .एकच मुल घरात असल्यामुळे भावंडासोबत केलेली सुट्टीची मजा लोप पावतेय . आंब्याचा रस किंवा कैरीचे पन्हे हल्ली पैसे फेकल्यावर बाराही महिने मिळतात त्यामुळे खास उन्हाळ्याची वाट पहावी लागत नाही . माणसाने स्वतःच आयुष्य सोयीच करून घेतलय खर पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मात्र नक्कीच गमावलाय .
   
हिवाळ्याचही तसच ,यंदा पाउस आला वेळेवर पण त्याचा मुक्काम लांबला त्यामुळे दिवाळीची गुलाबी थंडीही पावसाखाली जाईल कि काय अशी शंका होती . ही  निसर्गाची अस्थिरता वाढतच चाललीय त्यामुळे जगाची आर्थिक ,राजकीय,सामाजीक परिस्थिती बदलतेय . दिवाळीतला सगळा उत्साह हा वाढलेल्या महागाईने ,प्रदूषणाने ,लोकांच्या विचारातील संकुचितता त्यामुळे उदासीन वाटत होता .अगदीच कसा  दमट दमट!घराघरातून येणारे चिवडा चकल्याचे  सुगंध बाजाराच्या रेडीमेड डब्यामध्ये बंद झालेत . दिव्यांची केलेली रोषणाई देखील आपल्याच घरापुरती मर्यादित होती त्यामुळे आसमंत उजळून निघाला हे वाक्य आजीच्या तोंडीच राहिलंय . सगळच बाजारीकरण झाल्यामुळे आनंदाच माप देखील कमी झालाय!
  

   
पावसा वरही काही बोलायला नको. हवीहवीशी वाटणारी पावसाची रिमझिम कधी उग्र रूप धारण करेल आणि सर्वस्व हिसाकावेल याचा नेम नाही . नुकताच केदारनाथला झालेलं नुकसान त्याच पाणी अजूनही डोळ्यातून गेलेल नाही .       
       
पण म्हणून  काय जगण सोडलेलं नाही . हेही दिवस जातील ,संकटाचे ढग दूर होतील आणि परत तसच हिवाळ्यातील गुलाबी थंडीला झाकत स्वच्छ सोनपिवळ उन्ह पडेल . पावसाळ्यातील गारवा परत सगळ्यांच्या थकलेल्या मनाला ताजतवान करेल . 
महत्वाच हेच कि मधल्या प्रवासात न थकता न कंटाळता उजाडण्याची वाट पाहण !आणि नक्की उजाडणार ह्याची खात्री बाळगण !

Thursday 1 August 2013

माझ्या शब्दांच्या थैलीतून सांडलेल्या ढिगभर गोष्टी

एक कटिंग चाय ................भुरभुरणारा पाऊस ,हवेतला गारवा ,सगळीकडे पसरलेली हिरवळ गप्पांमध्ये रंगलेली तरुणाई आणि एक कटिंग चाय किती झकास combination आहे ना हे ?तुम्ही काहीही म्हणा पण चायची तलब काही औरच आहे .प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक टपरी तर असतेच ,आणि तिथला मामा म्हणजे फारच फ़ेमस कॉलेजमधील lectures मध्ये घालवलेला वेळ आठवला तर तो  फारच थोडा होता पण या टपरीवर मात्र जीवापाड प्रेम .  आयुष्यातले बरेचसे अनुभव हे इथेच  आले . कटिंग चहासोबत कितीतरी गोष्टी मित्रांनी share केल्या असतील मित्राची प्रत्येक अडचण आपली आहे आणि मी ती  सोडवण्याचा ठेका   घेतलाय या आवेशात कितीतरी अडचणी या चहासोबत गार झाल्या असतील मग ती पैश्यांची असू देत नाही तर पोरीची !नवीन मित्र जोडण्याची हीच एक जागा.  आपली पहिली भेट कुठे झाली होती रे हा प्रश्न बऱ्याच वर्षानंतर मित्राला विचारा नकळत उत्तर येत "मामाची टपरी यार………… "कोणी तिथे पहिल प्रेम यक्त केल असेल , रोज चोरून बघण्याची त्याची तगमग त्या चहासोबत यक्त झाली असेल. तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर नकळत तिच्या पापण्या हातात असलेल्या पेल्यावर स्थिरावल्या असतील . आणि मग दोघांचेही शब्द चहाच्या वाफेमध्ये विरून गेले असतील . अशा एक न अनेक आठवणी त्या कटिंग चहा सोबत जोडल्या गेल्या असतील . रात्री उशिरापर्यंत जागून लिहिलेले journals आणि PL मध्ये हटकून येणारी झोप हे घालवण्यासठी टपरीच्या कितीदा तरी वाऱ्या झाल्या असतील . कुठलही celebration हे चहानीच करायचं हा तर जणू अधोरेखित नियमच . तिथे बसून तासान तास निघून जायचा पण lecture मधला एक मिनिट  एका तासास्रखा जड जातो . प्रत्येकाच्या जीवनात चहासोबत आठवणाऱ्या आठवणी असतीलच . आणि ह्या मामांची चहा बनवायची पद्धतही खूप वेगळी असते भट्ट्याचा यज्ञ पेटवल्यावर साखर चहा आणि दूध याची आहुती टाकली जाते . अद्रकाचा सुगंध दरवळतो आणि चहाचे पातेले वर  करून ते धार कपात सोडली जाते आणि हे सगळं एका लयीत चाललं असत ... चहाला गरीब श्रीमंतीचा भेद नाही ज्या प्रकारे तो गरीबाच्या झोपडीत कमी दूध घालून बनतो त्याचप्रमाणे तो high क्लास लोकांमध्ये सुद्धा काचेच्या कपातून सर्व्ह होतो. चहाला वेळ नसते ... तो दिवसाला कधीही चालतो ...फक्त दोन पेक्षा जास्त वेळ झाला की "तुम्ही तुमचा करून घ्या आता "अस ऐकायला मिळत . मित्रांसोबत घेतलेला चहा ... आनंदी तर मैत्रीणीसोबत घेतलेला चहा एक एक घोट नजरेत बघत ,आणि मीटिंग मध्ये बॉस सोबत घेतलेला चहा आता या कामासाठी माझ्याकडे पाहू नये म्हणून तोंड लपवण्यासाठी तर मशीनचा चहा ऑफिसमधला वेळ घालवण्यासाठी असतो .कॉलेज मध्ये कोणी फुकट चहा पाजत असेल तर मित्रांची झुंबड निघते . रेल्वे मध्ये फिरणारे फेरीवाले चाययय  ssss या आवाजांनी स्टेशन आलाय हे कळतं .सर्दी खोकल्यावर घेतला जाणारा रामबाण उपाय म्हणजे गवती चहा. 

पुण्यात लिहलेलं वाक्य आठवत "चहाला वेळ नसते ,पण वेळेवर चहा लागतो "


Wednesday 26 June 2013

माझ्यातली आदर्श गृहिणी


सकाळी सहा वाजता घड्याळीचा गझर बंद करून माझ्या दिवसाची 

सुरवात होते . अजून ५ min झोपायला मिळाल तर मजा येईल असा 

विचार करून डोळे बंद केले की  समोर असलेल्या  कामांची यादी 

डोळ्यांसमोर नाचू लागते . आणि वेळेतच उरकल पाहिजे अशी deadline 
समोर दिसल्यावर माझी मजा चांगलीच झिरते .तिथुन चालू होतो 

माझ्या दिवसभराचा न थकणारा प्रवास . सकाळच्या प्राथमिक क्रिया 

आटपून माझा स्वंपाकघरात प्रवेश होतो. अजून देवाने दोन हात द्यायला 

हवे होते ही खंत मनाला लागते . कुठल्याही कामाला २ min जास्त देण मला परवडण्यासारख नसतं .एकच वेळला  स्वंपाकघरातुन वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळया चवीचे  सुंगंध दरवळू लागतात . रेडीओ मिर्चीवाला  R.J तुमचा दिवस चांगला जो म्हणून शुभेछा देत असतो. त्यावेळला मनात येत त्यापेक्षा "सगळ वेळेत होओ "ह्या शुभेछा सुद्धा चालतील . दुध ,चहा,नाश्ता आणि जेवण हे बनवून दोन घास कसेबसे कोंबले जातात . जेवण डब्यात बंद करून कॉलेजचे वेध लागतात . स्वतःला आरशात बघण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो . जाता जाताच पेपरची ठळक बातमी वाचली जाते . आपल्या आजूबाजूला काय चाललय हे शिळ झाल्यानंतर कळतं . मोबाईल ,पर्सें ,चाबी , डबा ,घड्याळ ह्याची मनात उजळणी करून माझा ८"३ चा टोल  पडतो . नवरयाचा "सावकाश जा "असा आवाज पायरया उतरताना कानात पडतो . आणि सावकाश चालणारी माझी गाडी स्पीड घेऊन वेळेत ,१ सेकंद आधी  कॉलेजमध्ये पोहचते तेव्हा "हुश्य " असा उद्गार निघाल्याशिवाय राहत नाही . आणि मी एका पूर्णपणे वेगळ्या अशा झोन  मध्ये एन्ट्री केलेली असते . 
दिवसभरात घ्यायची lectures ,practicals ह्याची तयारी सुरु होते. राहिलेल्या वेळेत मीटिंग्स  कॉलेजची इतर कामे आणि त्याच्या deadlines सांभाळावी लागतात . एखाद्यावेळी गणितातील समीकरण बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार करून सोडवण सोप आहे पण आयुष्याची समीकरणं सोडवताना काय वगळायच आणि काय बाकी ठेवायचं हेच काळात नाही . परत  कॉलेजचा परीघ ओलांडून माझी गाडी घराकडे धावते . तेव्हा आठवत काल सासूबाईचा फोन आला होता , त्यांच्या माहेरची लोक जेवायला येणार आहेत संध्याकाळच्या कामांची यादी परत माझ्या डोळ्यासमोर उभी ठाकते . जातांना घेऊन जाण्याचे सामान ,भाजीपाला पिशवीत घालून दरवाजा उघडल्या जातो . तेव्हा स्वतःसाठी केलेला एक कप चहा ,मिळालेली निवांत १ ० min खूप सुखून जातात . आणि  पाहुण्यांचा पाहुणचार ,गप्पा गोष्टी आटपून माझा दिवसभराचा प्रवास १ ० च्या ठोक्याला संपतो . 
रविवारची आतुरतेने वाट बघितली जाते ,कारण त्यादिवशी वाट्याला थोडासा निवांतपणा आला असतो . आणि मग ठरतात outings ,movies ,shopping किंवा एखादी नवीन कादंबरी ,मैत्रिणीला भेटायचे plans  आणि तेवढाच काय तो विरंगुळा . 
पण मनोमन विचार येतो अस का झालाय? …………………………
अस्थिरता ,कामच प्रेशर ,आ वासून बसलेल्या डेडलाईन ,घरच्या जबाबदाऱ्या हे दृष्टचक्र गंभीर रूप घेत आहे . आणि या साऱ्याशी  अभाव आहे संवादाचा .देवसाठी दिवसातली १ ० min सुद्धा  महाग  होतात . कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललय 
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असतांना ,छोट्याछोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग होत चाललाय . अचानक आलेली पावसाची सर, नुकताच उमलेलं फुल ,जुन्या आवडत्या गाण्याची धून . सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत?
आयुष्य म्हणजे ट्राफिक जॅम ,कर्कश हॉर्नचे आवाज,खणखणलेले रस्ते,डेडलाईन ,इ एम आए चे चेक अस का झालंय ?

                                 
               

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...