Thursday 13 December 2018

एक अनुभव असाही .....

आयुष्यात सतत वेगळं आणि नवीन करण्याची धडपड मला शांत बसू देत नाही . इंटर सोसायटी च्या वूमेन्स क्रिकेट सामना होणार हे घोषित झाल्यापासून आमच्याही सोसायटी मध्ये क्रिकेटचे वारे वाहू लागले. सरावासाठी फक्त १५ दिवस मिळणार आणि आमच्यासोबत चक दे इंडियामधला  शारुखखान सारखा कोणी कोच नाही त्यामुळे पुढे जावं कि नाही ह्या संभ्रमात आमचे ३ दिवस निघून गेले . पण बऱ्याच विचाराअंती आपलयाला  काही भारताचे प्रतिनिधित्व करायचे नाही आणि हरलोच तरी सोसायटी चे नाव अजून चार चौघात माहितीच होईल जास्त काही नाही हे ठरवून आम्ही युद्धाच्या मैदानात उतरायचे ठरवले   !!!  व्हाट्स अप ग्रुप वर मेसेज फ्लोट व्हायला सुरवात झाली तशी बरीच मैत्रिणींची नावाची नोंदणी झाली पण त्यापैकी एकाही कारभारणीला क्रिकेट कशासोबत फोडणीला टाकतात हे माहिती नव्हतं . तरीही उत्साह भरपूर होता  ४ सेल्फी तर नक्कीच ऍड होतील ह्या विचाराने काही लोकांनी मोर्चा पुढे वळवला . ४-५ दिवस   फक्त व्हाट्स अप मधले ईमोजी वापरून सामना चालू होता कारण विषय गंभीर होता "प्रॅक्टिस टाइम ". मॉर्निंग टाइम यावर वेगवेगळे उत्तर जमा झाली "बच्चे स्कूल जाते है टिफिन बनाना पडेगा ,इट्स टू अर्ली यार ,सकाळीच क्रिकेट नि  थकून गेल्यावर दिवसभराची कामे कोण करणार ??  " त्यामुळे दुपारची वेळ ठरवण्यात आली ,यामध्ये सुद्धा  महिलामंडळ आणि एकमत हा चक्क विरोधाभास आहे ह्याच्याशी मात्र मी एकमत आहे .    " इतने धूप मी स्किन का ग्लो कम हो जायेगा ,I cant play in office time इत्यादी  "आणि संध्याकाळी कोणाला जमेल विचारल्यास "माझी कार्टी शाळेतून येतात तेच बॅट  बॉल घेऊन पळतील,अंधार लवकर पडतो बॉल दिसणार कसा ??? "एकंदर प्रॅक्टिस टाइम हा विषय चांगलाच गाजला . त्यातल्या त्यात सुवर्णमध्य काढून सकाळी १० वाजता ची वेळ ठरली ,आणि अर्धा ग्रुप रिकामा झाला .



अशाप्रकारे सराव सुरु झाला पहिल्या दिवशी आपल्या घरी असलेले मुलांचे क्रिकेट टूल्स घेऊन यावे आणि  आधी सोसायटीच  पार्किंग वापरूया मग थोडे दिवसांनी मैदानात सराव करता येईल हे ठरलं . बॅट बॉल मारण्यापेक्षा जास्त वेळ बॉलच्या मागे पळण्यातच गेला .पहिल्या मजल्यावरचे  काका आमचा उत्साह बघून म्हणाले देखील "इंडियन वूमेन्स क्रिकेट टीम नि ११८ रन काढले ,तुम्ही १८ तरी काढून या ....मी माझ्या हातचा चहा पाजतो  ऑल डी बेस्ट !! ". कॅप्टन कोणाला करायचं  हा पुन्हा एक ज्वलंत विषय होता . तेव्हा स्वीटी चे नाव सगळ्यानीं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखून सुचवले चांगलं खेळता जरी येत नसलं तरी क्रिकेटचे नियम तिला इत्यंभूत माहिती होते.सोसायटी मध्ये खेळण्याचा फील येत नाही असे बघून  मोर्चा मैदानाकडे वळवला नंतर  सकाळ ची कामे लवकर लवकर उरकून १० वाजता न चुकता येणाऱ्या ८ जणींची टीम तयार झाली . "आज लवकर कसं आवरलं " इति कॅप्टन च्या सासु बाई "तुमची सून आता क्रिकेट टीम ची कॅप्टन आहे "इति कॅप्टन सुनबाई हा मजेदार खेळ मैदानावर पेक्षा घरी जास्तच रंगला  होता .   वूमेन्स सामना  साठी सगळे रूल्स अर्धे अर्धे ठेवण्यात आले होते जसे कि हाल्फ पिच , ७ ओव्हर ,७ जाणिंची टीम इत्यादी आणि बरोबरच होत ते. कारण ५ व्या  दिवशी खेळण्यात आत्मविश्वास आणि उत्साह आलाय अस समजून एकीने बॅट तोड परफॉर्मन्स दाखवला . त्यामुळे जेन्टस लोकांनी नुकतीच   क्रिकेट टूल्स ची खरेदी केली होती ती आमच्या चांगलीच पथ्यावर पडली.  खेळण्यांमध्ये थोडी सुधारणा करण्यासाठी  आपले आपले नवऱ्यांसोबत टी व्ही , शोकेस सांभाळून घरी प्रॅक्टिस करावी तसेच हा वीकएंड फॅमिली सोबत मैदानात क्रिकेट शिकवण्यात  घालवून साजरा करावा यावर शिकामोर्तब झालं . वीकएंड ला पतीदेव खरंच खेळण्यात खूप मज्जा येत आहे असे दाखवून संध्याकाळी जेवण मिळेल हा बेत मनामध्ये ठेऊन शिकवत होते . आणि शारुख खान नाही म्हणून काय झालं ??? आपले पतीदेव आज शारुख  खान  पेक्षा कमी नाही म्हणून सगळ्या गौरी आज आनंदी होत्या. हळू हळू फास्ट बॉलिंग ,विकेट कीपिंग ,आणि fielding मध्ये आम्ही प्राविण्य मिळवलेच . आता सामाना खेळण्याचा दिवस उजाडला ,अजून एक विषय समोर आला "टीम चे नाव काय ठेवायचे आणि सगळ्यात आवडता विषय कॉस्ट्यूम  सिलेक्शन ".... परत द्वंद्व सुरु . शॉपिंग करायची संधी  मिळाली . 

शनिवार तारिख  १५ डिसेंबर ,एकूण १४ सोसायटी च्या महिलांचा उत्साह पाहून डोळे दिपून गेले. आमचा पहिलाच सामना होता, गेरा नॉर्थ सोसायटी वेळ सकाळी ७:३०  पुढे काय झाले ?????



काही नाही जे व्हायचे तेच झाले .आम्ही हरलो पण सोबत एक अनुभव ,नवीन रोमांचकारी क्षण ,फील्ड वर लागणारी ताकद ,टीम वर्क ह्याची शोदोरी घेऊन बाहेर पडलो ते  गुणगुणतच ....

सोचा कहाँ था, ये जो, ये जो हो गया
माना कहाँ था, ये लो, ये लो हो गया
चुटकी कोई काटो, ना हैं, हम तो होश में
क़दमों को थामो, ये हैं उड़ते जोश में
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी, अपनी ये नाव है
बादल पे पाँव है...

Tuesday 11 December 2018

निसर्गाच्या शाळेत शिकताना


मी माझ्या मुलाला शाळेत पाठवत नाही मग तो शिकतोय कसा ???सगळ्यांमध्ये वेगळा दिसून येतोय खरा . हा प्रश्न माझ्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना जास्त भेडसावतो. आम्ही काय शिकतो ?कधी  शिकतो?असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असतात. आणि हेच प्रश्न मला लिहायला प्रवृत्त करतात. मी माझाच अभ्यास बरेचदा करते. ज्या वाटेवरून जातोय ती वाट ओळखीची किंवा नेहमीची नाही . आम्हीच आपल्या पाऊलखुणा निर्माण करतोय आणि वाट शोधतोय.  तो त्याच्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतोय . जेव्हा त्याला प्रश्न पडतात  तो त्याचे उत्तर स्वतःच शोधतो. एखाद्या  विषयात बरेचदा मला तो चुकीचं करतोय अस दिसतं . तेव्हा मला माझ्यावर संयम ठेवावा लागतो. त्याला "तू चुकला ,अस करू नकोस ,असं का केलास " ह्या प्रश्नांचा भडीमार पासून त्याला दूर ठेवणे आणि मागितल्यावरच   मदत करणे  नाहीतर शांत बसून राहणे  हा होमस्कूलिंगचा एक अलिखित नियम आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीपासून त्याला इजा पोहचणार नाही   तोपर्यंत मदत करायची नाही . तो चुकतो ,बरेचदा धडपडतो पण स्वतः उत्तर शोधून काढतो आणि ते बरोबर आहे कि नाही हे पडताळून सुद्धा पाहतो.

इतक्यात आम्ही वारली आर्ट शिकतोय . ते शिकताना वरचा चेहरा छोटा आणि खालची शरीर रचना मोठी एक पाय छोटा आणि एक मोठा असा प्रकार बरेच दिवसांपासून चालू होता . मला माहिती असूनही तो सुधारावा अस मला वाटलं नाही . थोड्या दिवसांनी त्याने वारली आर्ट स्वतः च्या फोटो शी पडताळून पहिले . आपलं कुठे तरी चुकतंय हे लक्षात आलं आणि त्यानेच त्याची  सुधारणा केली . आता ते  चुकीचं चित्र मला परत दिसलं नाही. नुकताच आम्ही सक्षम बाबतीत  शिकलेला एक नवीन धडा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉग मधून करतेय. 
बाबांना सुट्टी असेल तेव्हा आम्ही कुठे तरी भटकंती करायला निघतो . पुस्तकी विश्व ठाऊक असायलाच हवं पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि अनुभव माणसाला जास्त शिकवून जातात .या आठवड्याचा विषय होता " सिटी अँड कंट्री साईड .....  ह्यामधील फरक "हाच विषय लक्षात घेऊन आम्ही निघालो . वडगाव निंबाळकर ऐतिहासिक वारसा लाभेलेल  गाव .शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई निंबाळकर हीच माहेर .मी बालपणापासून कधी शेतात राहिले नव्हते . माझ्या माहेरी आणि सासरी हक्काची शेती अशी कोणाकडेही नाही आहे . त्यामुळे शेतात राहण्याचं माझं स्वप्न देखील पूर्ण होणार होत. गावापासून दूर असलेली  हिरवीगार शेती आणि मधोमध्ये टुमदार बंगला लागूनच गाईचा गोठा अस एकंदर चित्रात रेखाटल्याप्रमाणे सुंदर कॅनव्हास अनुभवायला मिळणार होत त्यामुळे आम्ही सगळेच आनंदात होतो. एका वडाच्या पाराजवळ येऊन बस थांबली  अनोखळी पाहुणे गावात कोण आले ??म्हणून लोकांची नजर आमच्यावर खिळली शहराचा तिऱ्हाहीतपणा चा स्पर्श अजून गावाला झालेला नाही. त्यामुळे पत्ता शोधयालाही जास्त वेळ लागला नाही. आम्ही आलोय याची बातमी हवेच्या वेगाने काकूंपर्यन्त पोहचली देखील. स्वागताला सजला काकी आणि सुनील काका दोघेही तयार होते. काका जेवढे शांत आणि अंतर्मुखी तेवढ्याच काकू चुणचुणीत  आणि बोलक्या एकंदर अपिरिचित अस वाटलंच नाही. गप्पांचा ओघ आवरल्यानंतर आम्ही फेरफटका मारायला निघालो . सक्षम खूप उत्सुकतेने सगळे बघत होता आणि काका काय सांगत आहे हे ऐकत देखील होता. चिंचेच्या झाडांची असलेली बाग ,त्याच्या खाली ओडक्यांची रचलेली रांग ,विहिरीच्या वर सुगरणींनी बांधलेला खोपा ,दूरवर पसरलेला काळ्या मातीचा पोत ,उसांची एकसंध दिसणारी झाडे ,शेतातला पांढरे शुभ्र थेंब अंगावर उडवणारा झरा ,उंच नारळाच्या झाडांमधून दिसणारा मावळणारा सूर्य , आणि खडखडका मधून वाट काढत टायर खेळणारी मुले,रात्री  बाहेर बाजीवर बसून अंगणात सांडणारे चांदणे ,  असे अनेक शहरात न अनुभवता येणारे अनुभव आम्ही घेत होतो. जवळच ऊस तोडणारा तांडा आपल्या कबिला सोबत राहत होता . एकाच मंद अशा दिव्याच्या प्रकाशात ७ -८ परिवारातील स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी चूल धगधगवत होत्या. भुकेसाठी मुलांची चाललेली रडारड ,भाकरीसाठी आईची चाललेली लगबग ,थंडी पासून वाचण्यासाठी  काड्यांच्या झोपडीमध्ये घेतलेला आसरा ,रात्री थकून दमून झालेली निजानीज आणि पहाटे शिदोरी बांधून ,मुलांना घरीच सोडून  परत कामावर जाण्यासाठी निघालेली पुरुष आणि स्त्रिया ह्यांची जोडपी . तसेच  काकांच्या मदतीने  गाईचे दूध कसे काढायचे ,चारा  कसा द्यायचा,गाई म्हशींना अंघोळ कशी घालायची ह्याचा सुंदर अनुभव त्यानी स्वतः त्याच्या चिमुकल्या हातांनी घेतला . चित्रात बघणारे पाळीव प्राणी आज तो जवळून आपल्या निरागस पाटीवर कोरत होता.  ह्या सगळ्या गोष्टींची नोंद आमच्या देखील  मनाच्या वहीत कायमची झाली. ह्या आजूबाजूला  दिसणाऱ्या त्याच्या त्रिजेच्या बाहेरच्या सगळ्याच गोष्टींचा   परिचय सक्षम आपल्या मनाप्रमाणे स्वतःशी करून घेत होता. काही शंकांचं उत्तर प्रश्न विचारून करून घेत होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शेतीची पेरणी,तोडणी ,पाणी सिंचन कसं होत हे समजावून सांगायचं अस ठरलं.काकांनाही त्याची कल्पना दिली .पहाटे उठून आम्ही सगळे शेतात निघालो . पण सक्षमच मन कुठे तरी दुसरीकडेच गुंतलेलं होत.कालपर्यंत इतका खुश दिसणारा ,हातात काडी घेऊन माती उकरून काढणारा ,झाडावर चढायला एका पायावर तयार होणारा ४. ६ वर्षाचं  कोकरू आज शेतात यायला नाही म्हणत होता. आम्हीही मूड नसेल म्हणून सोडून दिल आणि परत जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. आणि गप्पांमध्ये रंगून गेलो . थोड्या वेळानी आजूबाजूला तो दिसत नाही म्हणून हळूच दूरवर नजर टाकली ,तो एका १५ दिवसाच्या गाईच्या वासराशी खेळण्यात दंग होता.तो काय करतोय हे आम्ही दुरूनच बघत होतो. त्याने अंदाज घेऊन त्या वासराला आधी दुरूनच चारा  टाकला पण तो तोंड लावत नाही ,त्याने खा खा म्हणून प्रेमाने ,ओरडून सांगून बघितलं पण तो तयार होईना . हळू हळू जवळ जात त्याने एकट्यानेच त्याच्या पाठीवरून हात फिरवला . वासरानेही छान  प्रतिसाद दिला त्याची मनातील भीती नाहीशी झाली . मग काय त्याच्या सगळ्या  अंगावरून हळुवारपाने   कुरवाळणे चालू होत. तो हे सगळं एकाग्रपणे ,आजूबाजूचं भान विसरून आपल्यातच हरपून करत होता . त्याच्याशी गप्पा सुद्धा मारत होता. आम्ही त्याचा हिरमोड करायला मध्ये गेलो नाही. गाडीत परत निघताना आज आपण काय शिकलो हा प्रश विचारल्यावर त्याने फक्त माझं वासरू त्याचे नाव गट्टू आहे . त्याची आई मला पाहून कशी ओरडत होती मग मी काही त्रास देत नाही हे समजल्यावर ती कशी शांत झाली , तो चारा  का खात नाही ? तो डोळे उघडून कसा बघतो ह्याचे अगणित निरीक्षण त्यानी केलं होत. त्यामुळे सिटी अँड कंट्री साईड  ह्याचा अभ्यास करायला आम्ही निघालो ....पण त्याने त्याच स्वतःपुरत विश्व निर्माण केलं आणि तो शिकला . आता एका नवीन मित्राची गणना आमच्या यादीत झाली होती त्याच नाव होत "गट्टू "


सुंदर होती ती शाळा ना पाटी  ना पुस्तक होतं 
मातीची वही होती आणि लाकडाचा पेन होता
शिकायला अफाट  आसमंत कमी पडत होता 
गिरविलेल्या अक्षरांपेक्षा गाईचा ग श्रेष्ठ होता 

पुस्तकातल्या चित्राला अनुभवाची सीमा रेखाटलेली 
गंमतीतले क्ले पेक्षा  चिखलतली माती स्पर्शून गेली 
कागदावर काढलेला झाडाचा रंग आज फिका पडला 
आयुष्याचा धडा आज वेगळ्या  अर्थाने मनावर गिरवला 


Monday 19 November 2018

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ....

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ह्याच  कारण गेले कित्तेक दिवस शोधून काढण्याचा प्रयत्न करतेय . अजून पूर्णपणे सापडलं नाही तरीही आपणच आपल्यासाठी निर्माण केलेलं "आभासी विश्व " काही अंशी पटलेलं उत्तर आहे. जस पक्ष्यांना उडण्यासाठी आभाळ असतं  तसच आपल्याला ,आपली दोरी आपल्याच हातात ठेऊन सगळ्या विश्वात डोकावून येण्यासाठी आभासी जग निर्माण झालाय. माउस च्या एका क्लिक वरून तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून कुठेही जाऊन येऊ शकता . आणि फिरून येत असतांना आपण वास्तव आणि कल्पना ह्याची सीमारेखा हरवून बसतो . लहानपणी आजी चेटकीण ,परी ,राक्षस ह्यांच्या गोष्टी रंगवून सांगायची आणि तिच्या रंगवण्यात आपण आपल्या कल्पनेप्रमाणे ते मानस पटलावर रंगवायचो ,प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी होती गोष्ट संपल्यावर त्यातून बाहेर पडल्यावर वास्तव काय ह्याची जाणीव व्हायची . आता मात्र आपणच जादूगार झालोय हवे तसे चित्र काढून आपल्याला पाहिजे तसे रंग भरून एक आभासी  चित्र निर्माण करता येत आणि फेसबुक व्हाट्स अँप च्या माध्यमातून ते जगाला दाखवता येत . ह्या जादूचा उपयोग करून असंख्य मित्र सुद्धा जोडता येतात आणि मग सुरु होतो एक वेगळाच खेळ ,वेगवेगळे चित्र रंगवून खोटं विश्व निर्माण करण्याची आणि मी किती सुखी आहे हे दाखवण्याची चढाओढ !!!ह्यामध्ये आभास आणि वास्तव ह्याची गल्लत होते. नेमकं मला हेच हवं होत की माझ्या आवडी वेगळ्या होत्या,खर काय? आणि खोट काय ? ह्याचा गोंधळ सुरु होतो. 


           संध्याकाळी थकून आल्यावर दिलखुलास गप्पा माराव्या अस वाटलं ,आजूबाजूला कोणी नसले  तरी आभासी  माध्यमांचा वापर करून त्या मारल्या हि जातात .एकटेपणा काहीवेळासाठी कमीही होत  असेल कदाचित    पण त्यामध्ये भावनिक जवळीक कुठेही दिसत नाही . समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हाव  भाव टिपण्याचे सुख मिळत नाही. दिलखुलास हा शब्द  त्या गप्पांसाठी फोल ठरतो. कॉलेजमधे शिकवतांना शिकवण्याबरोबरच विदयार्थ्यांच्या चेहऱ्याचा पाट्या वाचणं माझा आवडता छंद  होता.एक इंजिनीरिंगचा  विद्यार्थी जो मला नेहमीच सगळ्यांमध्ये वेगळा वाटायचा ,दिसायला साधारण होता ,अभ्यासात जेमतेम पण मला वेगळं काय जाणवलं असेल तर त्याला आभासी विश्वात रमण्यापेक्षा समोर दिसणाऱ्या जिवंत व्यक्तींसोबत रमायला जास्त आवडायचं . त्याचे बाकी मित्र कॅंटीनमध्ये मोबाइल किंवा लॅपटॉप शी खेळत असतांना हा मात्र कँटीन मध्ये काम करणाऱ्या राजू सोबत गप्पा मारायचा . चक्क वडा पावमध्ये चटणी घालून प्लेट नेऊन द्यायचा . मी त्याला अस करतांना बरेचदा बघितलंय. लॅब असिस्टंट किंवा चपराशी लोकांच्या मुलांच्या  नावासकट शाळा, त्यांचे छंद ह्याची  खडानखडा माहिती ह्या पठ्याला  होती.तो नुसता गप्पाच मारायचा अस नाही संकटकाळी त्यांच्या मदतीला सुद्धा धावून जाताना मी नोटीस केलय.ऑफिसमधले कर्मचारी ,गेटवरचा सकाळचा आणि रात्रीचा सेक्युरिटी गार्ड देखील  त्याला नावाने आवाज द्यायचे. एक वेगळी जवळीक त्यांची मला जाणवली . बाकी मित्र त्याला वेड्यात काढतांना देखील मी ऐकलंय काय तर म्हणे हा संध्याकाळी आजी आजोबांच्या पार्कमध्ये जाऊन बसतो आणि गप्पा करतो. एकमेकांना मेसेजेस पाठवण्यात ,फेसबुक च्या पोस्ट वर कंमेंट्स लिहण्यात ,सेल्फी काढण्यात जेव्हा बाकी लोक मला मश्गुल दिसतात त्या सगळ्यांमध्ये जिवंत लोकांच्या भावनांची कदर करणारा हा नक्कीच वेगळा भासतो . फायनल सबमिशन घेताना तो वेळेवर हजर राहू शकला नाही ,तेव्हा तो आजारी आहे हे मला सेक्युरिटी वाले काका, कॅन्टीनचा राजू आणि एक आजोबा येऊन सांगून गेले ह्यावरून मला त्यानी नुसते जपलेले च नाही तर निभावलेले नातेसंबंध काय होते ह्याचा धडा समजला. 

व्हाट्स अप किंवा फेसबुक ह्यांच्या आहारी जाऊन आपण खर् च  काय गमावून बसलोय हे कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आज आभासी जग हे केवळ व्यक्त होण्याचं माध्यम  आजच्या पिढीसाठी झालय म्हणून हि पिढी निकोप वाढू शकेल का ह्यावर प्रश्न  चिन्ह निर्माण झालय.आवकशकतेपेक्षा जास्त वापर केल्याने ह्याचे दुष्परिणाम लवकरच घातक ठरतील. 

पास आऊट होऊन तो एका चांगल्या स्वाफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला लागला . कॉलेजमध्ये मार्कलिस्ट घ्यायला आला असताना माझी त्याच्याशी गाठ पडली ,"अजूनही वडा पाव मध्ये चटणी  भरतोस का ??  "माझा गमतीने विचारलेला प्रश्न.पण त्यानी दिलेलं उत्तरा वर मला विचार करायला भाग पडलं 
"वडा पाव मध्ये चटणी भरणं त्यासारखी मज्जा कंपनीमध्ये नाही मॅडम त्या निमित्ताने   एकावेळी अनेक लोकांशी संवाद साधता यायचा ,लॅपटॉप वरच्या आभासी जगातून पलीकडले जे विश्व दिसते  त्यामध्ये माणुसकीचे रंग भरता   येत नाही   "       

Thursday 4 October 2018

चार दिवसांचे गृहिणीत्व .....

written by :Vaibhav Paratwar


तसे तर भारतातल्या जवळपास सगळ्याच धर्मांच्या मान्यतेनुसार स्त्री ने महिन्यातली ४-५ दिवस बाजूला बसून विश्रांती घ्यायची असते. जरी या गोष्टीचे कारण किंवा उद्देश्य पवित्रता असा मानला गेला असला तरी त्यामागे वैज्ञानिक कारणे नक्कीच आहेत. असो, हा विषय याकरिता कि आम्ही पण ठरवलं कि आता महिन्यातले ४ दिवस बायको ला पूर्ण विश्रांती आणि स्वयंपाकघरातून सुट्टी द्यावी.  
आम्ही नुकतेच पर्युषण पर्व साजरा करून पुण्यात पोचलो आणि दुपारी बायको बाजूला बसली. त्या दिवशीचा स्वयंपाक तर झाला होता. पण आता ठरवत होतो कि पुढचे २-३ दिवस काय करायचं? या वेळी नेमकी आई सुद्धा गावाला गेलेली होती आणि मी या आधी पूर्ण स्वयंपाक कधी केला नव्हता. भाजी बारीक करणे, फोडणी घालणे किंवा फार तर फार खिचडी लावणे एवढं केलं होतं. आणि हो भांडी घासण्यात तर आपला हातखंडाच होता त्यामुळे त्याबद्दल काही काळजी करण्यासारखा नव्हता.
आम्ही नवरा बायको तर नुसती खिचडी खाऊन पण राहिलो असतो. पण प्रश्न होता सक्षम चा, आमचे साडेचार वर्षाचे वारसदार! त्याला पोळी/पराठा या शिवाय जमत नाही. मग ठरलं तर. या वेळेस पूर्ण स्वयंपाक मी करायचा. आता प्रश्न होता सकाळी स्वयंपाक करून ऑफिस सुद्धा गाठायचं. तरी माझं भाग्य म्हणावं लागेल कि पुण्यासारख्या शहरात ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे. तरी हे आव्हान स्वीकाराचं ठरवलं.
पहिल्या दिवशीचा अलार्म पहाटे साडेपाच चा लावलेला पण नेहमी प्रमाणे अलार्म बंद करून पडून राहिलो तो उठलो एकदम साडेसहा ला. उठून स्नानादि प्रातःविधी उरकून स्वयंपाक घरात शिरलो. पहिले पाणी गाळून घेतले आणि मग ठरवलं अगोदर आपण जे जमतं ते उरकून घ्यावं. पहिले अंदाजे तांदूळ, डाळ काढली नि कुकर लावला, थोडा अतिविश्वास दाखवला स्वतःवर, कारण बऱ्याच दिवसांनी वरण भात लावणार होतो. तरी नशिबाने साथ दिली आणि वरणभात बऱ्यापैकी जमला. 

भाजी हा एक प्रकार मला जमण्यासारखा होता, तेव्हा सोपी म्हणून दोडक्याची भाजी केली. आणि मात्र आता होता मोठा प्रश्न तो म्हणजे पोळ्यांचा. कणिक मळण्या पासून शिकायचं होतं. त्यासाठी मला मदत हवी होती, कुणीतरी सांगण्याची. बायकोला उठवणं भाग पडलं. किती पीठ घ्यायचं, पाणी कसं टाकायचं, किती टाकायचं,  तेल केव्हा आणि किती लावायचं असं सगळं तिने व्यवस्थित सांगितलं. तरी थोडं पाणी जास्तच झालं. तेव्हा थोडी अजून कणिक घेऊन तेल लावलं आणि एकदाचा आमचा कणकेचा गोळा तयार झाला. 

माझी हि अवस्था पाहून बायको ने फलक्यांपेक्षा पराठे करण्याचे सुचवले आणि मलाही ते पटलं. तिला तिथेच supervision साठी उभं केलं आणि मी पराठे लाटायला सुरुवात केली. आकार तर कधी महाराष्ट्राचा तर कधी श्रीलंकेचा येत होता पण नाईलाज होता. काळजी फक्त एवढी घ्यायची होती कि कडांना कच्च राहू नये. पराठे कशे भाजायचे, किती तेल लावायचं, कधी पालटायचे अस सगळं बायको सांगत गेली. एक दोन पराठे वगळता बाकीचे खाण्यालायक झाले होते असा शेरा खुद्द राणी सरकार कडून मिळाला! केलेल्या श्रमाचं फळ मिळालं असं वाटलं. पण खरी परीक्षा तर होती ती सक्षम ने जेवण करण्याची आणि त्याला आवडण्याची. त्यातही मी कसाबसा पास झालो :). 

त्यादिवशी डोक्यात विचार आला, ज्या गृहिणी नौकरी किंवा व्यवसाय करून आपल्या घरच्यांसाठी सगळा स्वयंपाक करत असतील त्यांची सकाळी सकाळी किती धावपळ आणि श्रम होत असतील? आणि आपल्या पूर्वजांनी जी हि ४ दिवस स्त्री ने बाजूला बसण्याची आणि संपूर्ण विश्रंती घेण्याची जी प्रथा आहे ती पण किती योग्य आहे ते कळलं.  पुरुषांना सुद्धा ४ दिवस आपली पाककला जिवंत ठेवायला आणि नवीन काही शिकायला मिळतं. तेव्हा सर्व पुरुषांनी महिन्यातून ४ दिवस तरी गृहिणीत्व स्वीकारावं आणि त्यातला आनंद घ्यावा!

Thursday 23 August 2018

फुलले रे क्षण माझे

या आठवड्यातले  दोन दिवस अगदी नीट घडी करून ठेवावे असे गेले. म्हणून नमूद करावेसे वाटतात . रोजच्या पेक्षा आयुष्यात वेगळं काही घडावं  अस नेहमी वाटतं
प्रसंग १-
 १५ ऑगस्ट ला अनाथाश्रमात जाण्याची संधी मिळाली,किंवा घडवून आणली . नुसतं झेंड्याबरोबर सेल्फी काढून स्टेटस ठेऊन स्वतंत्रता दिवस साजरा करावा हेच मुळात रुचत नव्हतं .नेहमी किट्टी ला  एकत्र भेटणाऱ्या आणि स्वतःची स्पेस जपणाऱ्या  आम्ही सगळ्याजणी अनाथाश्रमासाठी जाण्यास सज्ज होतो .  फळांनी भरलेले २ खोके , स्पोर्ट्स चे सामान  ,मिठाई आणि चित्रकलेच्या वह्या आणि रंग हे सगळं एका  कारच्या डिक्कीत कोंबून आम्ही टू व्हिलर घेऊन निघालो ,अंतर फार नव्हतं . १५ मिनिटामध्ये सगळे पोहचलो . संतुलन भवन ,असे  अनाथाश्रमाचे नाव होते  एकूण  वेगवेगळ्या वयातील ६० मुले तिथे राहत होती ,सगळी अनाथ होती अस नाही पण परिस्थितीमुळे राहायला आलेली होती  .तिथे जाऊन नक्की काय करायचं हे ठाऊक नव्हतं .आणलेल्या  वस्तूंचे वितरण करून निघून यायचे हे मनाला पटेना. थोडा सार्थक वेळ त्यांच्यासोबत   कसा घालवता येईल ह्याचे विचार  मनात चालू होते. एक दिवस का होईना आपण त्यांच्यासोबत ,त्यांच्यासारखं  होऊन जगूया . कृत्रिमपणा ,औपचारिकता दूर लोटून थोडासा आनंद वाटून घेऊया . लगेच सगळ्यांपुढे विचार व्यक्त केला,आणि आम्ही सरसावलो आयुष्याचा एक नवीन पैलू अनुभवण्यासाठी. 
सगळी मुले एका रांगेत बसली होती . आपल्याला काहीतरी वस्तू  मिळणार ह्या आशेने बघत  होती. नक्की सुरवात कुठून करावी ..ह्या मुलांना मोकळं कस करता येईल ???बरीचशी मुले ग्रामीण भागातून आलेली होती .त्यामुळे मराठी भाषाच संवांदासाठी माध्यम होत.  शेवटी कोण देशभक्तीपर गाणे म्हणून दाखवणार ????एकमेकांकडे बघून "तू म्हण तू म्हण " चालू होत. शेवटी ५-६ मुली लाजतच उठल्या "ए वतन ए वतन...  "सुरु झाले. आम्हीही आमच्या मुलांसोबत सामील झालो आणि एक  छान मैफिल रंगली. मुलांच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आपली ओळख करून द्यायला सुरवात केली "जिंदाबाद .... माझं नाव .... मी या शाळेत शिकतो .... मला इंजिनियर ,डॉक्टर ,पायलट  व्हायचंय " पाठ करून घेतलेले उत्तर ऐकायला आले. हे बहुतेक त्यांच्यासाठी रोजचंच असावं . रोजच्या सामान्य गरजा जरी पूर्ण झाल्या तरी ध्येय  गाठल्यासारखा आनंद ह्या मुलांना होत होता. पायलट ,इंजिनियर हे तर फक्त  मोठे मोठे शब्दच होते ह्यांच्यासाठी. मोबाइल,आय फोन घेऊन मिरवणारी श्रीमंत परिवारातील मुले आणि आज अंघोळ करायला साबण मिळालं म्हणून आनंद मानणारी मुले. किती हा एकाच समाजामध्ये आढळणारा विरोधाभास !!!
३ ग्रुप मध्ये ६० मुलांचे विभाजन केले. एका ग्रुप ला  डान्स ,दुसऱ्या ग्रुपला स्पोर्ट्स ,याचा माझ्या बाकी मैत्रिणींनी ताबा घेतला .. तिसऱ्या ग्रुपला  वारली चित्रकला मी शिकवणार होते.मुलांना  चित्रकलेची वही आणि रंगाचे वाटप केले  आणि अक्षरशः मुलांनी त्यांची प्रतिभा  रंगांसोबत कागदावर रेखाटली .त्यांचा आनंद रंगासोबत एकरूप झालेला मी जवळून बघितला . मुलींना मेहंदी लावली ,लिंबू चमचा खेळला . मिठाई वाटप  ,फळे वाटप केले आणि दिवस संपला . काही क्षण का होईना पण आनंद वाटायला जमलं . जाताना बरीच मुले फाटकापर्यंत सोडायला आली  होती,टाटा करून आम्ही निघालो ..परत नक्की येऊ ही आशा दाखवून .. जाताना सहज मागे बघितलं दोन मुले अजूनही त्या चित्राशी सवांद करताना दिसली . आणि खरंच आजचा स्वतंत्रता  दिवस साजरा झाल्यासारखा वाटला .ह्यानिमित्ताने एकच सांगावस वाटत

"हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे .""



प्रसंग २
 तारीख १९ऑगस्ट वेळ सकाळची ६:०० वाजता आज मी पहिल्यांदा मॅरेथॉन मध्ये धावणार होते. १८ तारखेलाच टी  शर्ट  ,बॉब घेऊन आले होते. ३ किमी RUN ,walk or  dance ह्यापैकी काहीही करा अस ठरलेल होत. जे जमेल ते स्वतःशी प्रामाणिक राहून करू असं ठरवून  झोपले  . सकाळी लवकरच जाग आली ,कारण स्वप्नात च मॅरेथॉन धावून दमायला झालं होत. लवकर आवरून नमूद केलेल्या ठिकाणी वेळेत पोहचले. २१ किमी आणि १० किमी धावणारे ,५ वाजताच निघाले होते. सगळी मिळून १७०० माणसं /मुले पळणार होती. सगळे घोडे जसे रेस साठी तयार असतात तशी सगळे जण तयार होते .  .आणि ५-४-३-२-१ शिट्टी वाजली आणि माणसांचा झुंड धावायला लागला. ओहोहो काय दृश्य होत छोटी मुले ,मुली,पुरुष वर्ग,महिला वर्ग, वयस्कर मंडळी सुद्धा ह्यामध्ये मागे नव्हती . पांढरा टी शर्ट घालून सगळी जण आपापल्या परीने अंतर कापत होती . एकच मिशन, एकच संदेश "clean  kharadi ,Green Kharadi " . रोजच्या मॉर्निंग वॉक पेक्षा हे नक्कीच  उत्साहाने परिपूर्ण होत . काही चालून काही धावून ३ किमी पूर्ण केले . डेस्टिनेशन ला कौतुक करायला ,फोटो काढायला ऑरगनायझर टीम उभी होती ३ किमी पूर्ण करणे खूप मोठी गोष्ट नव्हती पण माझ्यासारख्या पहिल्यांदा हे अनुभवणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या.  सहज वाटणारी  गोष्ट पण आनंद देऊन गेली. आणि खरंच सगळं करतांना खूप मज्जा आली . फक्त ह्याची कसर २ दिवस मात्र नंतर निघत राहिली. पण आलेला अनुभव दुर्मिळ होता .   शेवटी  केळी ,नाश्ता देऊन  थकवा दूर करण्यात आला.  मेडल घेऊन फोटो बूथ वर जाऊन फोटो सेशन पार पडलं. आणि यथासांग व्हाट्स अप वर स्टेटस अपलोड झालं.  पुढच्यावेळी ५ किमी चा प्रयत्न करायला हरकत नाही. ... अशी  गाठ सध्या बांधली आहे पुढच्या मॅरेथॉन साठी.


Sunday 29 July 2018

सरकारी कार्यालयातील चष्म्याची चौकडी ---आणि माझा अनुभव


नवऱ्याच्या परदेशी वाऱ्या सुरु झाल्या ,तेव्हापासून आपल्यालाही लवकरच ही सुवर्ण संधी मिळेल या अपेक्षेने माझ्याही पासपोर्ट ऑफिसच्या वाऱ्या सुरु झाल्या . आणि सरकारी कामाचा अजून एक नवीन अनुभव पदरात पाडून घेतला. माझं काम आणि सरकारी दफ्तर हे समीकरण मुळातच माझ्या कुंडलीत धोकादायक सांगितलं असावं. कारण ज्या सरकारी ऑफिस मध्ये माझं काम असतं तिथे समोरचा माणूस मला हेलपाटे घालायला मजबूर करण्यासाठी नियुक्त झाला असावा असाच अनुभव बरेचदा येतो. किंवा ही सगळीच सरकारी नोकर मला साच्यात ओतलेल्या चकलीच्या पिठाप्रमाणे वाटतात .पीठ कितीही वरून कितीही समर्पक वाटत असले तरीही वळण काटेरीच असतं ,समोरच्या व्यक्तीने एखादा जरी प्रश्न चौकटीच्या बाहेर जाऊन विचारला तर कार्यालयातील माणसाच्या चष्म्याच्या चौकडीतुन डोळे मोठे झालेच म्हणून समजावं. आणि ते विस्फारलेले डोळे बघून पुढचे पडलेले अगणित प्रश्न गिळून टाकले जातात . आणि मग पुढे काय करायचं हे न समजल्याने सुरु होतो एक वेगळाच खेळ. 

असाच एक अनुभव :स्थळ -पासपोर्ट ऑफिस :मुंढवा 

ह्या वेळी सगळ्या तयारी निशी जायचं आणि काम फत्ते करायचं म्हणून गुगल वरूनच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून गेले होते. ऑन लाइन फॉर्म भरून लागणाऱ्या कागदपत्रांची उजळणी ३ वेळा करून निघाले. नवऱ्याची मदत न घेता काम करायचा विडा उचला होता त्यामुळे जबाबदारी जास्त होती. गाडी विमानाच्या गतीने हाकायला सुरवात केली जणू परदेश वारीलाच निघाले होते .मॅप धुंडाळत ऑफिसला पोहचले. आतमध्ये सोडायला sms ची पडताळणी करण्यात आली . वेळेच्या आधीच पोहचल्याने वाट बघायला लागणार होती. बेंच वर बसून तिथे आलेल्या लोकांचे चेहरे वाचण्याचे माझे आवडते काम सुरु झाले. बरीच जण जणू आताच फॉरेन ला निघालोय ह्या आवेशात होते. त्यामध्ये काठी घेऊन आलेले आजी आजोबा सुद्धा नातवाच्या घरी जाऊन तोंडात दात नसले तरी पिझ्झा कशाशी खातात हे बघण्याला उत्सुक होते . नेलपेण्टचा कलर तर निघाला नाही ना हे दहादा तपासून पाहणारी कॉलेज सुंदरी दूरदेशी वाट बघत बसलेला एखादा बॉयफ्रेंडला भेटण्यास उत्सुक होती. कोणी एक काकू सुनेच्या बाळंतपणाच्या तारखेपर्यंत पोहचण्याचा गडबडीमध्ये दिसत होत्या. काही शाळकरी मुले सामना खेळण्याच्या आधीच सामना जिंकल्याच्या आनंदात होते. मी मात्र निश्चिन्त होते आज आपण गड जिंकणारच म्हणून लढाईला तयार होते. 


प्रचंड गर्दीतून वाट काढत ,बराच वेळ रांगेत उभे राहून रिसेप्शन ला माझा नंबर लागला . सगळ्या कागदपत्रांची पडताळणी झाली. आणि व्हायचं तेच झालं ,address प्रूफ साठी गॅस बुक ची पावती चालत नव्हती त्यांना गॅस कनेक्शन चे पुस्तक हवे होते. ऑफिस जवळून घराचे अंतर १६ की . मी होते ,वेळ होता २० मि आज जर आणले नाही तर पुढची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार होती. माझ्यापुढे एकच पर्याय होता नवऱ्याला फोन करून पुस्तक मागवणे. आणि जड अंतःकरणांनी फोन लावला आणि पुस्तक मागवले. आणि परत नवऱ्याच्या मदतीशिवाय सरकारी काम करू शकते हे च्यालेंज घेणार नाही म्हणून कबुली दिली. आणि अशाप्रकारे एक टप्पा पूर्ण झाला. प्रक्रियेनुसार आतमध्ये सोडण्यात आले. जुना पासपोर्ट कॉलेज मधूनच काढला होता त्यामुळे एवढे हेलपाटे घ्यावे लागतात हे माहित नव्हतं .आता पासपोर्ट फक्त रिन्यू करून घ्यायचा होता. 


N -३० ह्या नंबर च कुपन घेऊन प्रवेश केला. मोठे मोठे स्क्रीन लावलेले दिसत होते.त्यावर आपला कुपन नंबर आणि काउंटर नंबर डिस्प्ले होणार होते. डोळ्यात तेल घालून ,डोळ्याची पापणी सुद्धा न लावता मी नंबर शोधत होते. न जाणो पुन्हा काउंटर ला पोहचायला उशीर झाला तर परत पुढची चक्कर !!!!!!!!!!शेवटी काउंटर ला पोहचले.A -काउंटर च्या पलीकडे बसलेल्या माणसाला चष्मा नव्हता त्यामुळे परत चौकड हलायचा प्रश्न नव्हता. त्याच्यासाठी हा खेळ रोजचाच असावा. हळुवार आवाजात "मॅडम पर्स ,गॉगल ,फाईल ,मोबाइल सगळं बाजूला ठेवा आणि स्माईल करा आपण तुमचा फोटो घेणार आहोत "एवढ्या आपुलकीने बोललेले शब्द तेही सरकारी कार्यालयात माझ्यासाठी नवीनच होते. खरंच नकली का असेना पण मोठं हसू आणून फोटो काढण्याचा सोहळा पार पडला . हुश्श !!आता दुसऱ्या जाळ्यातून सुखरूप बाहेर पडले होते. काउंटर बी पडताळणी विभाग परत कागदपत्रांची पडताळणी झाली. सामान्य माणसांच्या हातून होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं तर इथे असलेली सिस्टिम खरंच कौतुक करण्यासारखी आहे.बसायला ऐसपैस जागा ,गर्दी लवकर कमी व्हावी म्हणून स्क्रीन आणि सगळं कॉम्पुटर द्वारा हाताळण्याची सुव्यवस्था .ह्यासाठी tcs ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे . आता माझी रवानगी झाली ते काउंटर सी कडे सरकारी झोन. आता मात्र पलीकडे बसलेली बाई एकदा कागदपत्रांकडे आणि एकदा माझ्याकडे बघायला लागली आणि माझ्या मनात धोक्याची पाल चुकचुकली आणि परत चष्मयची चौकडी हलली चष्मा नाकावर सरकून बाई बोलू लागली "मॅडम आधार कार्ड मध्ये pooja आहे आणि जुन्या पासपोर्ट वर puja आहे ,स्पेल्लिंग मध्ये चूक आहे , " अरे बापरे पहिल्यांदा मराठी भाषेतील उकार चे महत्व कळले . "गॅस बुक वर pooja च आहे " - इति मी .बाई अक्षरश : ओरडली हे काही आयडेंटिटी प्रूफ नाही. नेक्स्ट अपॉइंटमेंट घ्या म्हणून सांगून बाई सुटल्या.चष्मयची चौकडी परत हलू नये म्हणून त्यासाठी काय करायचं हा प्रश गिळून टाकला. आणि घरी येऊन गुगल ला हाताशी धरलं .पेपर मध्ये जाहिरात देऊन नावात बदल अस छापून आणावं लागेल हे कळलं. आणि आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट ऑफिस च्या कृपेने वर्तमानपत्रात नाव छापून आणले आणले 


ठरलेल्या दिवशी पासपोर्ट ऑफिसला जाऊन पोहचले. आता नाही परदेशात जायला मिळालं तरी चालेल पण इथे परत येणार नाही म्हणून मी मनाशी ठरवलेले होते. आणि २ परीक्षा पास करून ३ री परीक्षा उत्तीर्ण होईल कि नाही ह्या द्विधा मनस्थितीत होते. परत सी काउंटर ला बोलावण्यात आले ,नावात बदल केला हे ठीक आहे मॅडम आधार कार्ड सोडून अजून एक आयडेंटिटी प्रूफ दाखवा . परदेशात जाण्यसाठी एवढी पडतळणी एअरपोर्ट वर सुद्धा करत नसतील. किंवा इथून तावून सुलाखून निघाल्यावर ती पडताळणी काहीच वाटत नसावी. हे पहिल्यांदा परत पाठवलं तेव्हाच का सांगितलं नाही ?????नकोय मला पासपोर्ट असं तोंडावर फेकून उठून यावं कि काय ,अस वाटत होत पण File नीट बघा एकतरी प्रूफ ठेवलं असेल हे सांगून मला थोडा श्वास घ्यायला वेळ दिला ह्या बद्दल मी काकांचे धन्यवाद मानले. आणि File च्या एका कोपऱ्यात कॉलेज चे जुने आयडेंटिटी कार्ड दिसले फोटो वरून माझेच असावे , परत A काउंटर ला जाऊन स्कॅन करून घेतले . आता मात्र तिथला शिपाई पण ओळखायला लागला होता ,मॅडम परत आल्या का म्हणून गालातल्या गालात हसत होता. एक केस रोज असते हे आणि तेही विशेषकरून बायांचीच अस म्हटल्यावर, नवरा मला येऊ दे सोबत म्हणून का सांगत होता. हे आता कळलं. आणि सरते शेवटी काकांनी एक शब्दही न काढता कागदपत्र तपासून ओके चा शिक्का मारला . आणि शिक्याच्या आवाजाबरोबरच माझा जीव भांड्यात पडल्याचेही आवाज झाला. 

आणि परदेशात पोहचल्याच्या खुशीत मी ऑफिसमधून बाहेर पडले. आता मात्र मी सातव्या आसमंतात होते.

"अजून पासपोर्ट हातात आला नाही तोवर आनंद साजरा करू नको "इति नवरा . 



पासपोर्टच्या प्रतीक्षेत .....

Monday 4 June 2018

डिजिटल इंडिया चल पड़ा है ......आज भारत को सवारने


कल सुबह जल्दी उठकर गैलरी में आकर ठंडी हवा खाने का मन हुआ, बहुत व्यस्तता के कारण ये मौका बहुत ही कम मिलता है|  अंगड़ाइयां लेते ही निचे देखा तो सफ़ेद रंग का टी-शर्ट पहने हुए लड़के लड़कियों की टीम रास्ता साफ़ कर रही है| देखकर आश्चर्य लगा ....और मन में एक कमीसी भी लगी की यहाँ अंगड़ाईयाँ न लेकर मुझे भी निचे होना चाहिए था|  सैटरडे की छुट्टी को नींद में न गवाँते हुए ये लोग आज एक बहुत महत्वपूर्ण काम करने आये थे| बात बहुत अच्छी है की भारत बदल रहा है| आज की युवा पीढ़ी को अहसास हो रहा है की शुरुवात हमें हमसे ही, अपने घर से ही करनी है| 

देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है,
युवाओ के हाथो से ये भारत संवर रहा है,
मेरा देश, मेरा देश, मेरा देश.... 
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !

तीन साल पहले, प्रधान मंत्री नरेन्द्र मोदीजी ने एक मिशन का शुभारंभ किया था|  और आज की युवा पीढ़ी इसमें उतर आयी है ये बहुत गौरव की बात है| हमारे  पहले की पीढ़ी कहती है की आज कल के युवा लोग, न संस्कार जानते है नाहीं आत्मीयता, इनको तो बस डिजिटल साधनो से प्यार है|  ये पूरी तरह सच नहीं है, डिजिटल होने के साथ साथ एक जागरूकता भी इस पीढ़ीमें दिखाई देती है| 

ये लिखने का प्रयोजन यही है की, सिटी बैंक की तरफ से खराड़ी स्वछता अभियान का उपक्रम IT के युवाओ दवरा करवाया गया|   सबको सिटी बैंक की तरफ से सफ़ेद टी शर्ट दी गयी और ये युवक युवतियां निकल पड़े इंडिया को स्व्च्छ बनाने, अपने सेल्फी फोटो और व्हाटस एप के स्टेटस को अपडेट करते हुए, सफाई जारी थी|  लगातार ३ घंटे ये सब लोग जोश के साथ काम कर रहे थे|  जो उंगलिया कंप्यूटर पर तेजीसे चलती है वही उंगलिया आज क्यारी बैग्स की गन्दगी उठा रही थी|  और सही अर्थो में डिजिटल इंडिया आज रस्ते पर उतरकर ग्रांट रोड पर फैली हुई अनवांटेड फाइल्स रीसायकल बिन में डाल रहे थे| बस धीरे धीरे ये डिजिटल इंडिया अगर ठान ले तो भारत को फिरसे सुनहरा बना सकता है|

   जानते हैं कि सफाई एक दिन का काम नहीं है. सफाई जब तक आदत का हिस्सा नहीं बन जाती तब तक गंदगी वापस लौटती रहेगी. स्वच्छता अभियान यदि एक बार सफल भी हो गया, तो भी देश में स्वच्छता टिकी नहीं रह पाएगी जब तक  सफाई हमारे निजी और सार्वजनिक जीवन का अभिन्न अंग नहीं बन जाती.हम अपने आप से कमसे कम ये तो उम्मीद रखे की खुद सफाई न कर पाते तो न सही पर कमसे कम जो करते है उनकी मदत   तो करे ,ये भी नहीं कर सकते तो कम से कम  उनको प्रोत्साहित करे और ये भी नहीं हो सकते तो कृपया अपने घर की गन्दगी बहार रस्ते पर न डाले

Friday 18 May 2018

माझी भटकंती .... निसर्गरम्य कोंकण


नुकतीच कोंकण मधील मालवणला जाण्याची संधी मिळाली . सकाळी ६ वाजता पुण्यावरून निघालो .कोल्हापूर पर्यंत उन्ह आपला मीपणा सोडायला तयार नव्हतं .आपली कोकणात जाण्याची वेळ चुकली बहुदा हे रुखरुख मनाला जाणवत होती. थोडे अंतर कापल्यानंतर एक वेगळच वळण रस्त्याने घेतलं .आणि निसर्गरम्य दृश्य दिसायला सुरवात झाली. शहरात न अनुभवता येणाऱ्या बऱ्याच गोष्टी मन वेधून घेऊ लागल्या . वळणावळणाचे रस्ते ... कौलारू घरे ,समोर आणि मागे दोन्ही बाजूनी अंगण ,अंगणामध्ये आंबा ,फणस,काजू सुपारी ह्यांच्या बागा ,समुद्र किनारे हे निर्सगरम्य दृश्य बघायला डोळे आणि मन दोनीही उघडे ठेऊन बघायला लागतं . निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण इथेच बघायला मिळते. नारळाच्या झाडांमधून दिसलेले निळं आभाळ म्हणजे  जणु  निळ्या कोऱ्या कागदावर  हिरव्या रंगानी रेखाटलेली ठिपक्यांची रांगोळीच . छोटे छोटे टुमदार कौलारू घरे सगळीकडे विखूरलेलेआहे. मासेमारी,पर्यटन हाच येथील लोकांचा प्रमुख  व्यवसाय.  सगळं दृश्य डोळ्यात साठवत वळणदार रस्त्यावरून लाल माती उडवत आमची गाडी गंगनबावडा घाट ,कणकवली ला वळसा घेत मालवणला पोहचली .  

नुकतीच संध्याकाळ होत होती . प्रवासाचा शिण  आलेला होता . बाजारपेठ मधून वाट काढत गाडी "वासंती निवास "ला पोहचली . स्वागताला शैलजा ताई उभीच होती. आम्ही हॉटेलचे बुकिंग केले  नसून होम स्टे ला पसंती दिलेली होती. आणि खरंच पाहुण्यांचं स्वागत करतात तसच स्वागत  आमचं वासंती निवास आणि चिवला बीच वर समुद्राच्या लाटांनी केलं . निळेशार पाणी ,दुधासारख्या उसळणाऱ्या लाटा क्षितिजा पर्यंत पसरणारा मावळत्या सूर्याचा प्रकाश सगळं प्रवासाचा शीण निघून गेला . आणि आम्ही सर्वात अगोदर धाव घेतली ती समुद्राकडे ..... माझा मुलगा सक्षम वय वर्षे ४  त्याच्या आयुष्यात प्रथमच इतका विशाल समुद्र पाहत होता . त्याच ते निरागस ,लोभस रूप आणि त्याला मनमुराद दाद देणारा अथांग सागर ...हे दृश्य अवर्णनिय होत . स्विमिन्ग पूल मध्ये पहिल तेवढंच पाणी पण त्याहीपलीकडे जाऊन इतका अथांग ,विशाल ,दूरवर पसरलेला समुद्र पाहून तो हरखून गेला. मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही घराकडे परतलो. आणि वासंती निवास आणि तेथील लोक खरोखरच सागरासारखीच विशाल हृदयाची आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी मोजक्याच पण नीटनेटक्या केलेल्या सोयी आम्हा पुणेकर लोकांना लाजवून सोडतात . वासंती निवास पासून चिवला बीच हाकेच्या अंतरावर आहे. खिडकीचे तावदाने उघडली तर समोर फक्त समुद्र आणि फक्त समुद्र दिसतो.   दिवस मावळला आणि रात्रीचा समुद्र परत वेगळाच भासू लागला. रात्रीचे जेवण आटपून आम्ही परत किनाऱ्यावर वाळूत जाऊन बसलो. रात्रीचे समुद्राचे रूप हे केवळ त्याचे स्वतःचे असते ,कारण सूर्याची चमक त्याला रात्री येत नाही. संध्याकाळी चकाकणारे समुद्राचे तेच पाणी रात्री शांत ,निश्चल ,सावरकरांच्या ओळी  सार्थक करत होता 
                                                              सुंदर नभ हे , नभ हे अतलची हा 

                                                      सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची हा 


.                                                                 

आणि मला माझा मीपणा विसरायला भाग पाडत होता . आकर्षणासाठी लावलेला वर्ख फार काळ टिकत नाही. रात्रीचा मूळ रूपात आलेला समुद्र आणि त्याच्यामुळे उठून दिसणारं चांदणं हे गणित मला जास्त भावलं . शांत वातावरण ,थंडगार वारा , फक्त लाटांचा आवाज , काळोखाची शाल पांघरून आलेली निशा , आणि पांढर शुभ्र चांदणं हे वसुंधरेचे रूप पाहून मी परत एकदा प्रेमात पडले. आणि निद्रेच्या स्वाधीन झाले . 
पश्चिम किनारा असल्यामुळे सकाळचा सूर्योदय बघायला मिळाला नाही . सकाळचे आन्हिक आटपून आम्ही भटकंतीला निघालो . दीपक भाऊ आम्हाला घेण्यासाठी आलेच होते. स्कुबा डायविंग हा एक अफलातून अनुभव घेण्यासाठी आम्ही सज्ज होतो. सिंधुदुर्ग पाहून,शिवाजीमहाराजांना नतमस्तक होऊन आम्ही निघालो . बुलंद असा तो गड समुद्राच्या लाटांना अंगावर झेलत तटस्थ उभा आहे . जिथे समुद्राचे पाणी शांत होते तिथे समुद्रात असलेल विहंगम विश्व आपल्याला जवळून अनुभवता येत. एक छान साखळी या लोकांची आहे . दीपक भाऊ आम्हाला बोटीवाल्या माणसाकडे सोपवून निघून गेले.  स्कुबा डायविंग करवून घेणारी टीम वेगळीच होती ,आणि पाण्यामध्ये हात पकडून समुद्राचा तळ दाखवणारी वेगळीच लोक होती. हा सगळा प्रकार आपल्याला असुरक्षित वाटत असला तरी या लोकांच्या अंगवळणी पडला आहे . खर सांगायचं झालं तर माझं मन मला हा अफलातून प्रकार करण्याची परवानगी देत नव्हतं . इथली सगळी लोक हे जबाबदारीने आणि सुरक्षित कररवूं घेतात ह्याची शाश्वती होती तरीही . माझ्या सोबत असणाऱ्या मावशीच्या  १५ वर्षाच्या मुलींनी सुद्धा हे दिव्य न घाबरता पार पाडलं आणि एक वेगळाच अनुभव आपल्या आयुष्यात नोंदवला . पण माझ्या बाबतीत असा घडलं नाही मी पाण्यात दोन वेळा उतरून परत आले. आणि एका सुंदर अनुभवाला मुकले. हे कायमच मनात राहिलं .(पुढच्या संधीच्या प्रतीक्षेत) . तिथून आम्ही देवबाग ला गेलो .अहाहा ..काय ती निसर्गाची किमया ..... भरभरून दिलय निसर्गानी कोकणला ...... हातच न राखता !!!!  

वॉटर स्पोर्ट्स ची असलेली उत्तम सोय, अरबी समुद्र आणि करली नदीचा संगम , मगरीच्या आकाराची सुनामी पासून बनलेली टेकडी त्याच्यावर असलेली उंचच उंच नारळाची आणि विविध प्रकारची झाडे . मस्तच !!!!! नदीचे संथ पाणी आणि समुद्राच्या खळखळून येणाऱ्या लाटा हा संगम इथे बघायला मिळतो. समुद्राच्या पाण्याचा रंग एके ठिकाणी बदललेला दिसतो ,तेवढ्याच भागात लालसर लाटा दिसतात ,असे विचारले असता ,शिवाजी काका म्हणजे ए बी पी माझा चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बातमीदार आमच्यासोबत बोटवर होते आणि तेच सगळी माहिती देत होते.  ते म्हणाले इथे थोडासा भाग जमिनीचा आहे जो सहा महिने  पाण्यात सहा महिने वर  असतो. होडीला इथून जाताना जोरात हिसका बसतो तो याच कारणाने . काय हे अजबच !!


असे एकेक सुंदर नवल अनुभवता आले. सक्षमची पोहण्याची हौस इथे पूर्ण झाली . कारण संगम असल्यामुळे पाणी शांत आणि खोल नव्हते. 
बनाना राईड मध्ये बसवून समुद्र फिरून आणतात आणि मधेच जिथे पाण्याची खोली जास्त नाही तिथे पलटी मारतात ,अंगामध्ये सेफ्टी जाकीट असल्यामुळे आपण लगेच बाहेर येतो पण अनुभव थरारक असतो . त्याच्यानंतर मी मजा घेतली ते पॅरासिलिंगची ,एका अनुभवाला मुकली असली तरी हा पण माझ्या आयुष्यातला रोमांचित अनुभव म्हणावा लागेल. बोटीने समुद्राच्या मधोमध्ये आपल्याला नेतात ,सेफ्टी जाकीट सोबतच पायात नायलॉनची दोरी अडकवतात आणि एका वेळी दोघांना पॅराशूटला जुंपतात ,आणि पॅराशूट आकाशात  सोडतात ऐकूनच भीती वाटली ना????ओहोहो काय  दृश्य होत अविस्मरणीय खाली निळंशार पाणी वरती पांढर शुभ्र आकाश आणि मध्ये आपण .... कुठे बघावं आणि काय काय बघावं. शब्द हि कमी पडे ,न वर्णिले जाती हे अनुभवांचे कवडसे !!!!

अशाप्रकारे आमचा दिवस संपला आणि सोबत एक वेगळाच अनुभव पदराशी घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. 

काय ती लाल लाल माती कोकणाची 
कशी मोजावी उंची माडाच्या झाडाची
कौलारू घरे आणि घनदाट वनराई
देवाने इथे कशाचीही कमी केली नाही

प्रत्येक वेळी वेगळा भासणरा समुद्र हा
कधी शांत ,कधी अवखळ ,तर कधी खवळलेला
निसर्गानी सुंदर निळा आणि शुभ्र रंगवलेला
पण पर्यटकांनी स्वार्थसाठी गढूळ केलेला

नीटनेटकी आणि साधीसुधी टुमदार  घरे
जे निसर्गानी दिले ते सहज स्वीकारणारी
 प्रामाणिक आणि निसर्गाशी एकरूप झालेली
आदरतिथ्य जपणारी भाबडी माणसे

क्षितिजापर्यंत  विस्तारलेलं मोकळं  आभाळ
दूरवर पसरलेलं अथांग निळंशार पाणी
आणि त्यावर दिमाखात डोलणारी नाव
फळांचा राजा हापूस खाऊन जातो भाव

करवंद ,जांभूळ ,काजू हा इथला मेवा
निसर्गाचा साज इथे येऊनच बघावा
डोळ्यात साठवाया किती हा ठेवा
परतुनी मागे बघता आठवणी राहाव्या 
Add caption


Friday 6 April 2018

बऱ्याच दिवसांनी सहजच !!

सक्षम ला घडवतांना मला काय वेगळा अनुभव येतोय हे आज मी शब्द रूपाने उतरवण्याचा प्रयत्न करते आहे . जगापेक्षा वेगळी वाट निवडलीय खरी ,चालायला आम्ही सज्ज पण आहोत पण हि वाट नेमकी कुठे पोहचवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पण छान  वाटतोय हा प्रवास ... तुम्ही कधी केलय असं ? ध्येय किती दूर आहे ,कुठे थांबायचं हे माहित नसताना चालत राहणे.करून पहा मज्जा येईल आयुष्यात. आमच्याबाबतीत हेच होतंय . आजूबाजूचा आई हा वर्ग मुलांना सकाळी उठवणे  , दप्तर तयार करणे,डब्बा भरणे,स्कूल बस पर्यंत जाऊन टाटा करून येणे , दुपारी बस ची वाट बघणे , होम वर्क करून घेणे किंवा स्वतःच करणे.......  डब्बा संपवला नाही म्हणून ओरडाओरडी ,वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवणे ... हुश्श !! ह्यामध्ये धावतांना दिसतात  .पण माझ्याबतीत हे काहीच घडत नाहीय . कारण स्कूल ह्या विषयापासून मी आणि सक्षम खूप दूर आहोत. आमचा दिवस तो उठेल तेव्हा चालू होतो . सकाळी लवकरच उठाव असा माझा आग्रह नाही. पण तो त्याची झोप पूर्ण करून वेळेतच उठतो. सकाळची थंड हवा अंगावर घेऊन मोकळ्या मैदानात चक्कर मारून प्रसन्न सूर्योदय बघत बघत आमच्या  अखंड उत्साहपूर्ण दिवसाची सुरवात होते. निसर्गाच्या शाळेपुढे मला बाकडे टाकलेली चार भिंतीची बंद शाळा ठेंगणी वाटते. आणि विशेष म्हणजे आम्ही एका शाळेसमोरूनच हिंडत फिरत जात असतो. माझ्या घराच्या बालकनीतून थोडं दूर बघितलं कि शाळेचं तेच तेच चित्र रोज दिसत. ठराविक वेळेला वातानुकूलित ,उत्तम दर्जा असलेल्या बसेस गेटसमोर येऊन थांबतात , सगळी मुले रांगेत उतरून आपापल्या वर्गामध्ये प्रवेश करतात,आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ६ तास घड्याळीच्या ठोक्याप्रमाणे यंत्रवत चालू असतात , त्या शाळेमध्ये प्रत्येक स्पोर्ट्स साठी क्लब हाऊस  आहे. एकदम  उत्तम !!!यामध्ये वादच नाही आणि का असू नये पालकांकडून घेतल्या गेलेल्या फीसमधून एवढं समृद्ध ठेवणं आवश्यक आहे.पण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन ,स्विमिन्ग पूल मध्ये नुकताच हात पाय मारायला शिकलेला तो छोटा मुलगा ,अजून आनंद घ्यावा असं वाटलं तरीही घड्याळात ठोका वाजतो ,कारण त्याला संगीतावर ठेका धरायला जायचं असत. ह्याच शाळेमध्ये संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त इतर मुलांसाठी स्विमिन्ग पूल ओपन असतो , सक्षम आणि माझी हझरी तेव्हा तिथे लागते. आणि  हा माझा  स्वतःचा अनुभव आहे स्वच्छंद सोडल्यानंतर त्याची प्रगती लवकर होते आहे. अक्षरांच्या ओळख बाबतीतही बोलायचं झालं तर  ,जी मुले वयाच्या ५ वर्षी वाचायला शिकतात माझा मुलगा कदाचित उशिरा शिकेल  ह्याच दुःख अजिबात नाही पण तो स्वतः धडपड करत शिकेल ,अनुभवातून त्याच तो शिकेल ,ह्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं काही नाही .मी फक्त त्याच्यासाठी एक माध्यम आहे.  १२ वय वर्षी वाचायला शिकलेला एक मुलगा वयाच्या १४ वय वर्षी एका मासिकाचा  संपादक म्हणून काम करू शकतो,असेहि  कुठेतरी वाचनात आलय.नैसर्गिकपणे शिक्षण हे केव्हाही उत्तम .  माझी कुठल्याही शाळेवर टीका नाही ,आपल्या मुलाला शाळेत टाकावं किंवा टाकू नये  असा माझा कोणाला आग्रहही  नाही. हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे . सगळेच जण प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतात असही नाही. फक्त एका मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेल्या आईच्या चष्म्यातून स्कूल ते होमस्कूल  आणि या गोष्टीकडे कसं  बघावं हाच दृष्टिकोन ठेऊन मी लिहत आहे. 
मी स्वतः कॉलेजमध्ये जेव्हा ठराविक तासाला ठराविक शिकवायचं असा ठोकताळा स्वतःशी बांधून जाते तेव्हाच lecture आणि स्वछंद ,ठरवून न घेतलेलं lecture ह्यामध्ये खूप अंतर मला जाणवते. चौकट  आखून घेतली कि काही गोष्टींना सीमा राहते  . अभिव्यक्ती  स्वतंत्र हाच मुळात शिक्षणाचा पाया  आहे. आपण काय शिकतोय ह्यापेक्षा कस शिकतोय हे खूप महत्वाचं आहे. शिकण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम वर  अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्याला क्षितिज च शिकण्यासाठी अंत असू शकतो . कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होणं किंवा एखादी  डिग्री मिळवणं हे समाधानी आयुष्य जगण्यासाठी कारण असू शकत नाही. शिक्षणातली उच्च पदवी मिळवण्याकरिता मी सध्या संशोधन करतेय ,पण   मला प्रासंगिक उद्भवलेल्या प्रश्नावर तोडगा काढता येईल का ???हा मला बरेचदा पडलेला प्रश आणि त्यावर न सुचलेलं उत्तर !!!! बालपण म्हणजे एक निरागस जगणं आहे. ध्येय गाठण्यासाठी त्याला स्पर्धेच्या शृंखलेत न अडकवता तिथपर्यंत जात असलेली वाट ,प्रवास अनुभवता यावा . हि प्रामाणिक इच्छा . किती सुंदर असेल तो प्रवास जेव्हा  मुक्कामच असेल तुमचा खरा प्रवास !!!


Monday 19 February 2018

चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे

अनुभवी प्रधानमंत्री  आधीच घरी असतांना नवीन येणाऱ्या गृहमंत्र्यांचे स्वागत आनंद आणि दुःख अशा  सरमिसळ भावनांनीच होत असतं . "सुनबाई आलीय आता तुम्ही मोकळ्या व्हा "मैत्रिणींनी दिलेला टोला ,हसून टोलवावा कि झेलावा हेच कळत नाही . मोकळे व्हा पण नेमके कोणत्या कोणत्या प्रकरणातून ?हे मात्र  ठरत नाही . मुलगा शिकून मोठा झाला चांगल्या उच्च पदावर नोकरी सुद्धा आहे. भरभक्कम कमावतो ,आणि आईच्या शब्दाबाहेर नाही हं ,बापरे केवढं ते सुख सासूबाई या समस्त वर्गाला  .आयुष्याची शर्यंत जिंकलेच समजावं ह्या घडीला. मग काय तोऱ्यात शोध सुरु होतो तो सुनबाईंचा ,प्रत्येक सार्वजनिक प्रसंगाला हळदी कुंकापासून ते दूरच्या नात्यातल्या लग्नापर्यंत हजेरी लावणे सुरु होते.आधीच जाड काच असलेल्या चष्म्यातून योग्य ती मुलगी टिपण्याचा कार्यक्रम कोपऱ्यात बसून चालू असतो, आणि न जाणे लग्नात अशा किती समस्त भावी सासूबाई बसल्यात हे ओळखूनच सगळ्या मुली वावरत असतात. कमाल आहे नाही!!सुंदर नटून थटून ,चेहऱयावर जमेल तेवढं स्मित ठेऊन ह्या भावी सुना बागडत असतात . त्या जाड काचातुन  नजर बरोबर कोणावर तरी खिळून जाते ... ... आणि मग काय विचारपूस चालू. तिच्या घरी जाऊन  केवळ लोकांनाच नाही तर घरातील वस्तू बारकाव्याने बघितलेल्या असतात  आणि कुठल्या गोष्टी रीतील सोडून आहे आणि कुठल्या धरून हे अचूक  टिपलेलं असतं  . आपल्या साच्यात बसणारी निघाली तर सोन्याहून पिवळं नाहीतर शोध अभि जारी है !!!!

   बऱ्याच मुलींना नाकारून एक पसंत केली जाते .  सोनारयाच्या दुकानात जाऊन संपूर्ण दागिने बघून सुद्धा मनासारखं नाहीच मिळालं असा म्हणून एकाचा स्वीकार होतो अगदी त्याचप्रमाणे,पुढची अवघड असणारी पण समर्थपणे पेलणारी क्रिया म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नसणाऱ्या मुलाला शब्दात अडकवणे. तिच्याबद्दल ऐकलेलं ,न ऐकलेलं उत्तमच सगळ्यांना ऐकवणे.आणि आपली आई आपल्यासाठी योग्यच करत आहे असा म्हणून मुलाने दिलेला होकार  म्हणजे संस्काराची पावतीच !!!!अशाप्रकारे घरातील प्रधानमंत्री खरंच  प्रधान बनून सगळं पार पडतात. आणि सासूच्या भूमिकेत शिरतात . मनात मात्र धाकधूक कायम असते ,एक अनोळखी चेहरा ,अनोळखी घराणं  आपल्या काळजाच्या तुकड्याशी कायमच  जोडणं . आणि आपल्या भविष्याची मदार काहीप्रमाणात त्या मुलीच्या खांद्यावर टाकणं ."आजकालच्या या नवीन मुलींचं आपल्या सारख्या सासवांसोबत जमणं  सोपं नसत. त्यांचं शिक्षण,त्यांचं स्वतंत्र ,त्यांची कमाई मोठी मोठी होत चालीय ना " महिला मंडळाच्या एका सूनग्रसित सासूचा टोला आठवतो. आणि आपल्या वाट्याला आलेला वाण हा उत्तमच असेल आणि नसला तरी जे बाकी जगाच होत तेच आपल्यासोबतही होईल अशी  अशी शंका वजा  समजूत काढून पुढला प्रवास ठरतो. हे झालं सासूबाईंच्या मर्जीप्रमाणे ठरलेल्या  लग्नाबद्दल . पण जे लग्न नवरा मुलाच्या पसंतीप्रमाणे ठरतं त्यातही सासूबाई ह्या नटाची कहाणी वेगळी नसते. 

आधीची गोष्ट वेगळी होती लग्नामुळे एक मुलगी अख्या कुटुंबाशी जोडल्या जायची .कितीही आवडो किंवा न आवडो जन्मभर ते ओझं वाहायची पण आता मात्र लग्न दोन व्यक्तीच होत आणि निम्या लोकांना तेही धड सांभाळणं अवघड जात . मुलाने पसंत केलेली मुलगी पदरी पाडून घेणं तिचा स्वीकार करणं हे पण एका दिव्यातून जाण्यासारखंच आहे. आपल्या सुनेला काय निक्षून सांगायचं ,काय बजावायाच ,काय मनावर ठसवायचं  याची यादी सासूबाई मनात घोळवत असतात. मुली सासरी जातात तेव्हा तिची आई अस्वस्थ होतेच पण सून येणार म्हणून मुलाची आई देखील अस्वस्थच असते. शेवटी काय "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे " . 


सध्या माझी भूमिका सुनेची आहे. सुनेबद्दल नंतर कधीतरी !!!

Tuesday 2 January 2018

माझी शाळा

सगळ्यांच्या शाळेशी काही खास आठवणी जडलेल्या असतात . मोठे झाल्यावर  लहानपणीच्या गमतीजमती सांगताना आपणही नकळत हरखून जातो .आणि मग आठवते आपण शिकलो ती शाळा. गावी गेल्यावर मधेच शाळेसमोरून जाताना अनेकदा वाटत आतमध्ये जाऊन बघावं, पण संकोच वाटतो आता तिथं आपल्या ओळखीचं कोणीच नसणार . आणि "नुसतं बघायला आले " अस सांगायला विचित्र वाटेल ! म्हणून बरेचदा हिम्मत होत नाही . पण या वेळी मुक्काम बरेच दिवस होता. सक्षम ला माझी शाळा दाखवेल म्हणून आश्वासन दिल होत . त्याप्रमाणे त्याला घेऊन गेले देखील . कारंजा  म्हणायला छोटस गाव पण राहणारी लोक मात्र अगदी रसिक ,मनाने दिलदार ,मनमिळाऊ ,अशी आहेत . माझ्यावेळी चांगल्या समजणाऱ्या शाळाही जेमतेम तिनच  . दोन शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शाळेचं नाव जे . सी कारंजाच्या व्यक्तीला विचारलं तर लगेच कळेल . पण शाळेचं पूर्ण नाव होत जिणवरसा  चवरे हायस्कूल . त्या शाळेत शिकणारी माझी तिसरी पिढी . प्रत्येक पिढीने बघितलेले शाळेचे रंगरूप हे वेगवेगळे होते. आतामात्र शाळेचा पूर्ण कायापालट झाला आहे. 
नेहमी शाळेत आल्यावर सायकल लावून जायचे नेमकी त्याच जागी गाडी लावून आतमध्ये शिरले. प्रार्थनेला उशीर व्हायचा  तेव्हा रस्त्यामध्ये उभी राहून बोलणी खावी लागायची आजही कोणीतरी ओरडेल हीच धाकधूक मनात होती. किती खोलवर प्रभाव असतो काही गोष्टींचा मनावर ,आणि डोळ्यसमोर एक एक आठवणी दाटू लागल्या . दारामधून आत शिरताच नजर वेधून घ्यायचा तो काळा फळा ,त्यावर काही खास गुणांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे .  शाळेत असताना खूप हेवा वाटायचा ह्या गोष्टींचा . इंगळे सर आम्हाला चित्रकला शिकवायचे त्यांच्या सुंदर मोतीसारख्या असणाऱ्या अक्षरांमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे . पुढे ते विद्यार्थी  त्या क्षेत्रात यश मिळवतील किंवा न मिळवतील पण सरांनी लिहलेलं नेत्रदीपक कामगिरी हा शब्द त्याच्यासाठी मित्रमंडळींमध्ये भाव मिळवून द्यायचा. प्रत्येक सरांची शिकवण्याची आपापली लकब होती . दरवर्षी तेच शिकवावं लागायचं पण सगळे जण खूप आत्मीयतेने शिकवायचे . तेव्हा शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नव्हतं . त्यांची विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ दिसायची. आणि म्हणून आजही संस्कृतचा देव शब्द चालवायला सांगितला  तरी  उच्चार पूर्ण आठवत नसले तरी ती विशिष्ट लय डोक्यामध्ये पचलेली  आहे .  पी टी  चा तास आम्हाला खूप आवडायचा कारण राऊत  सर पोटात दुखत आहे म्हटलं कि बसायला जा म्हणायचे मग थोड्या वेळानी खेळायला परवानगी मिळाली कि  पोटातले दुखणे पळून जायचे . भूगोलाच्या तासाला वडतकर सर समोर बोलावून नकाशावर राज्य शोधायला सांगायचे ,त्याचा परिणाम अजूनही प्रत्येक राज्याची राजधानी लक्षात आहे. खूप छान  होते ते शाळेचे दिवस , शिकण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. आतासारखी रॅट रेस  नव्हती. शाळेत जायला मजा यायची . 
आतामात्र शाळा बदलून गेली आहे ,नवीन दिमाखात उभी असलेली तीन मजली इमारत शाळेची प्रगती पथावर असलेली वाटचाल दाखवून   देते पण त्या जुन्या इमारतीची सय नवीन इमारतीला  नाही .  स्टाफ रूम जवळ एक प्राजक्ताच झाड दिमाखात उभं होत त्याचा सुगंध पूर्ण शाळेत दरवळला  होता. पण आता त्याची जागा कुंड्यानी घेतलीय . ती आपलीशी वाटणारी शाळा कुंड्यांप्रमाणे खुंटल्यासारखी जाणवली. नवीन झालेली संगणक लॅबोरेटरी , पुस्तकांनी भरलेले वाचनालय बघून अभिमान वाटला . नवीन पिढीप्रमाणे शाळेने देखील आपल्यामध्ये बदल घडवून आणला तर !ती तर काळाची गरज आहे. बाहेर निघतांना  सक्षमला 
जे दाखवायला आणले होते ते तिथे नव्हतेच . कारण मी मोठी झाली तशी माझी शाळा देखील मोठी झाली होती. मला माझी शाळा परत दिसेल हि अपेक्षा नक्कीच फोल ठरली. 

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...