Wednesday, 17 June 2020

कागदावर शिंपलेली ओल्या भावनांची कविता

निःशब्द होत्या मनातल्या भावना माझ्या 
लिहतांना कवितेतील ओळी  तुझ्यासाठी 
आठवतेय तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण कवितेसाठी 
घेतले  काही खास  आठवणींचे मोती ओवण्यासाठी  

भेटलास असा ,जसा ठरवून नकार माझ्यासाठी 
टीव्हीवर वर्ल्ड कपचा सामना आणि होती समोर मी 
उगाच बोलत होतास ,ध्यानीमनी फक्त सुरु होत  क्रिकेट 
तेव्हा कुठे होते ठाव तुला घेणार मीच तुझी  विकेट 

योगायोग घडला असा एकच मैत्रीण भेटावी तुला आणि मला 
का नकार देतोय पूजाला अस विचारावं तिने तुला?
सहजच लावलेला फोन माझा ,बरंच काही घडवून गेला 
तुझ्या हाकेमध्ये  माझा होकार मिसळून गेला 

कधी भेटावं बागेतल्या बाकावर ,कधी पाणीपुरीच्या गाडीवर 
कधी भेटावं लपून कधी घरच्यांचं अवचित्य साधून 
छान  होते ते  दिवस आता जाणवतंय मागे बघून 
तेच क्षण सोबत असतात जीवनाच्या प्रवासातून 

तुझ्या चुका मी ,माझ्या तू सांभाळून घ्याव्या 
संसाराच्या कडू गोड आठवणी सोबत घेऊन चालाव्या 
जगात उत्कृष्ट आणि  परिपूर्ण असं  काहीच नाहीये 
आणि हे तर तू आणि मी मांडलेलं संसाराचं गणित आहे  

भाजीत कमी झालेलं मीठ तू चालवून घेतलस 
आखूड झालेल शर्ट देखील मी आणलय म्हणून घालून घेतलास 
कधी कधी निरर्थक असलेली माझी बोलणी ऐकून घेतलीस 
हीच मला तुझ्याकडून मिळालेली  प्रेमाची पावती होतीस  

बऱ्याच गोष्टी शिकाव्या तुझ्याकडून असा आहेस तू 
पैश्यांपुढे कधीही  नाते श्रेष्ठ हे दाखवून देतोस तू 
तू ठरवलेल्या रस्त्यावर न डगमगता चालतोस तू 
म्हणून माझ्यासाठी नवराच नाही पण एक मित्र आहेस तू 

तुझ्या येण्याने सुरेल झाली माझी मैफिल हि 
हवीशी वाटे मला अबोल संध्याकाळ जरी  
सुगंध दरवळतो फुलांचा जीवनात असा कि 
कसे सांगू या कवितेच्या ओळींमधूनी 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

लग्नाचे आमंत्रण

लग्नाची रेशीमगाठ अशी हि कोण बांधे न कळे
जिनेंद्र अश्विनी चालू करिती नवं जीवनाचे सोहळे
संगई परिवार  जोडिती नाते डोणगावकरांशी  शी वेगळे
२५ नोव्हेम्बर, शनिवार १ वाजताचा मुहूर्त हा जुळे
अमृत मंगल कार्यालय सुभाष रोड ,बीड मधले  गाठले
शैला , गिरीश सव आरती   स्वागतास आपुल्या उभे हे ठाकले 
स्वरूची भोज लग्नानंतर घेऊन आपण आम्हास आनंदावे
हेच आग्रहाचे आमंत्रण  संगई परिवाराचे समजावे
फक्त आपले आशीर्वाद   नवं दाम्पत्यासाठी घेऊन यावे

Tuesday, 2 June 2020

सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....

सध्या lockdown मध्ये मुलांना शाळेत  पाठवायचा धोका पालकांना जाणवतोय ,त्यामुळे आता शाळेची पूर्ण फी भरून शाळा online  (डिजिटल)चालू होते आहे ,पण परत पालकांना संभ्रम आहे की मुले एवढा वेळ लॅपटॉप किंवा मोबाइल  समोर कसे टिकतील ??? मग सुरु होतोय प्रवास ह्याला काहीतरी दुसरा पर्याय आहे का हे शोधण्याचा  ???मलाही बरेच दिवसात ह्या विषयावर बरेच फोन आले . आम्हाला एक वर्ष शाळेत पाठवायचं नाही त्याचे किंवा तिचे होमस्कूलिंग करायचे आहे ....त्यासाठीच हा ब्लॉग लिहावासा वाटतोय. 

एक वर्ष शाळेतून काढून मुलांना घरी ठेवणे म्हणजे होमस्कूलिंग नव्हे ,आपला होमस्कूलिंग कडे बघण्याचा हा दृष्टिकोन मुळातच चुकीचा आहे.होमस्कूलिंग म्हणजे स्वअध्ययन ,स्वतः ,स्वतः साठी निवडलेला मार्ग.   होमस्कूलिंग  हे काही एक किंवा दोन वर्ष करायची समायोजन (adjustment )नाही .... हा  एक आयुष्यात मुलांना वेगळ्या वाटेने घडवण्याचा जीवनभराचा संपूर्ण पूर्ण प्रवास आहे. ह्यामध्ये फक्त शाळेत न जाणारा एकटा मुलगा किंवा मुलगी समाविष्ट असते असं नाही ,त्याच्या भवती घरातील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलतं असते.पण हा प्रवास घरी सगळे  एकमताने  आनंदाने अनुभवू शकतात. त्यासाठी थोडी मनाची तयारी करावी लागते . आपण आपल्या मुलाला जन्म दिला आहे त्याची पालनपोषण करण्याची जबाबदारी हि आपलीच आहे ती शाळेवर किंवा अजून कोणावर ढकलून आपण त्यामधून सुटू शकत नाही. पण म्हणजे याचा अर्थ त्याला मांडीवर घेऊन बसून सतत शिकवणे असा नाही किंबहुना तो त्याचा स्वतःच शिकतो त्याला आवडणाऱ्या गोष्टींपर्यंत तो पोहचतो तिथे पोहचण्याचे मार्ग तो स्वतः शोधून काढतो पालक म्हणून आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या सोबत असणे एवढाच आहे.  

शिकणे ही  एक नैसर्गिक प्रक्रिया आहे  तेवढीच सहज जेवढे सहज जन्माला आलेला   बाळ बोलायला शिकतो. मुलगा जसजसा मोठा होऊ लागतो तश्या आपल्याला त्याच्या साठी काय वाटतं हे आपण कायम त्याला सांगायला जातो ,तू असं केलं म्हणजेच तुझं चांगलं होऊ शकतं हे आपण त्याच्या कोऱ्या पाटीवर  बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सुद्धा स्वतःची विचार करण्याची एक शैली असू शकते किंवा तो अनुभवातून शिकू शकतो हे आपण मान्य करू शकत नाही. असाच एक आमचा अनुभव सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....

विषय अगदी साधाच आज आम्ही (सक्षम माझा ६ वर्षाचा मुलगा आणि मी )दोघांनी मिळून पिशवी शिवली .सगळ्यात आधी लागणारे साहित्य जमवले  :-रुमाल ,सुई ,दोरा आणि सोबत खूप सगळे कुतुहूल. आज करण्यासाठी काही विशेष नव्हतं आणि असं काही विशेष नसलं कि आम्हाला अफलातून कल्पना सुचतात . आज सक्षम स्वतः एक रुमाल आणि सुई दोरा घेऊन आला आई आपण ह्याची पिशवी शिवू शकतो का ? डोळ्यात खूप सगळे कुतुहूल आणि शिकण्याची जिद्द दिसत होती ,छे !!! काहीपण काय त्यापेक्षा दुसरं काहीतरी कर ... पिशवी शिवून काय तुला शिंपी व्हायचंय कि काय?

  ह्याप्रमाणे झिडकारून न देता मी पण त्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये शामिल झाली,जणू ह्याआधी मी कधीही पिशवी शिवली नव्हती ....आणि खरंच जाणवलं आपण ती कशी वापरायची हेच शिकलो होतो पण शिवतांना असंख्य अडचणी येऊ शकतात हे नवीन होतंच .  रुमालाची नीट घातलेली घडी ,कैचीने कापून दिलेला चौकोनी आकार, हे सगळं त्याचे त्यानीच  ठरवलं मी फक्त तिथे हजर होती. त्याचा अंदाज घेऊन तो पुढे जात होता आता सुईमध्ये दोरा  घालण्याचा खेळ सुरु झाला एक डोळा बारीक करून मोठा करून त्याच्या हॅन्ड स्किल्स तो पडताळून पाहत होता ,मी पण त्याचीच कॉपी करत होते,पण तो सुई आणि दोरा एकमेकांमध्ये जाईना,बराच वेळ सुरु असलेला डाव अर्ध्यवार सोडून जायला त्याचे मन तयार होईना ,मग सुरु झाली शोधाशोध .... घरात असलेली कुठली पुंजी   वापरून हे काम पूर्ण करता येईल ,बरीच अवजारे आणली त्यामध्ये चाकू,टाचणी,सेप्टी पिन आणि बरेच काही .....   तो थकला पण हताश मात्र झाला नाही ,असंख्य गोष्टी पडताळून पाहण्यात गर्क होता हे करतांना फक्त आई आहे आजूबाजूला हा विश्वास त्याला होता .... मी शिकवावे अशी त्याची अपेक्षा नव्हती त्याला जरुरी होते  ते माझे तिथे असलेलं अस्तित्व,आणि मुलाच्या भावनिक आणि शारीरिक  विकासासाठी पालकांचा हा रोल खूप मोलाचा आहे. माझ्यासाठी दोरा सुईमध्ये पोहचला किंवा नाही हे महत्वाचं अजिबात नाही पण तो ज्या प्रक्रिया वापरून ध्येय पर्यंत चालत गेला  ते खूप कौतुकास्पद आहे आणि माझ्या दृष्टीने हेच स्वअध्ययन ...... सुई टोचली ,शिवण वाकडी गेली  पिशवीचे भोक मोठं झालं एवढं कि त्यातून सामान बाहेर येईल पण  सुंदर होता तो क्षण ... "एक दिवस पूर्ण फुकट घालवला ? " ...... नाही खरंच नाही 
 मनसोक्त  आज तयार झालेल्या पिशवीत आम्ही आयुष्याकडे पाहण्याच्या विविध कला शिकलो ,प्रश्नांचे उत्तरे काढायला शिकलो ..आणि एकमेकांसोबत असण्याचा सुंदर प्रवासाचे साक्षीदार होतो ... आणि तीच पिशवी घेऊन निघालोय पुढचा प्रवास करायला 

Tuesday, 21 April 2020

माझ्या मनातली ती रिकामी बरणी

आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिवस आता कुठे अंगवळणी पडायला सुरवात झाली होती . रोजचा दिवस कंटाळवाणा न वाटता काहीतरी नवीन शिकण्याची संधीच घेऊन येत होता. प्राणायाम करतांनाच एक सुंदर झुळूक  सुंगध घेऊन येत होती . परत परत तोच सुंगंध नाकाजवळ दरवळत होता. डोळे बंद करून मन एकाग्र करून आठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि हो हा सुगंध खूप ओळखीचा होता .....खूप जवळचा होता अरेच्चा !!!हा तर आंब्याच्या मंजिऱ्या  चा  दरवळणारा सुगंध होता . समोर रो हाऊस मध्ये बरीच  आंब्याची झाडे आहेत,त्याला कैऱ्या आलेल्या दिसल्या होत्या पण हा सुंगंध खूप जवळून येत होता. आणि आठवलं ३ दिवसांपूर्वी मैत्रिणी कडून रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी  मागवून घेतली होती आणि quarantine च्या सूचनांप्रमाणे त्याला हात ही न लावता ती पेटी सुद्धा काही दिवस  quarantine   मध्ये एका बाजूला ठेऊन दिली होती.आंबे अजून कच्चे च आहेत असे समजून आम्ही त्याला उघडून पहिले नव्हते .  आज जणू हा सकाळी सकाळी दरवळणारा सुगंध त्या रसाळ पिकलेल्या   आंब्यांची आठवणच घेऊन आला होता . 



एरवी बाकी कुठल्याही ऋतूत न मिळणार हा फळांचा राजा त्याचे अस्तित्व तसेच टिकवून आहे.केवढी ही  त्या आंब्याला मिळालेली लोकप्रियता खरंच त्या राजाची  बातच निराळी.प्लम , ऑलिव्ह,पीच हि त्याच्याच जातीची फळ पण छे !!त्यांना हि उपमा कुठे ?त्याचा दरारा वेगळा !त्याचा रुबाब वेगळा !त्याचा ढंग वेगळा!त्याची ऐट काही औरच एकंदर आमचा लाडका आंबा खरचं सर्वांमध्ये वेगळा . आंब्याचे पाने सुद्धा एक मंगल कार्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते . आंब्याच्या डहाळ्या दाराला लावून चैत्र महिण्याची सुरवात होते ते गुढीपाढव्याला .  पातळ असलेली साल काढून केशरी लालसर रसाळ मधुर,सुगंधित बाहेर आलेला रस बघून मन कसं   बघूनच तृप्त   होऊन जातं . पुण्यामधली सुजाताची मँगो मस्तानी,खत्री बंधूचे मँगो आईसक्रीम ,दुर्वांकूरचा रस ,चितळे चे आम्रखंड ह्यांना लोकप्रिय करणारा हा आंबाच !!आज मी पण सकाळी सकाळी ह्या आंब्याच्या प्रेमात पडले . आतापर्यंत फक्त आंबा हा बाजारातून आणणे आणि खाणे एवढंच ठाऊक होतं पण lockdown मध्ये चक्क घरीच माच  टाकून आंबे पिकवण्याची हि पहिलीच वेळ . २ bhk मध्ये एका कोपऱ्यात हा माच आणि दरवळणारा सुगंध अनुभवण्याची माझी पहिलीच वेळ.एक सुंदर मोहर घरात आलाय आणि त्या चैत्राच्या सुगंधात मन न्हाहून निघतय.  

आता बघा ना ,कच्ची छोटुशी हिरवीगार कैरी झाडाला लटकलेली बघून तो तोडण्याचा मोह अजिबात आवरत नाही . तसंच  उन्हाळ्यात भेळ बरोबर मीठ लावलेली कैरी म्हणजे अप्रतिम combination. मला आजीची उन्हाळ्यात आवर्जून आठवण येते ती यासाठी कैरी बाजारात आली कि तिची लगबग चालू व्हायची ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. उगाच नाही "लोणचं घाल त्याचं " हि म्हण रुजली. कैरीची चटणी ,कैरीचा तक्कु ,कैरीचे पन्ह एवढंच काय कैरीच्या आतमधली  कोय  वाळवून त्याची सुपारी ती करायची .केवढा तो उरक आणि केवढी ती हौस !!आज मी  हेच  सगळं करायला जाते पण तेवढा उसंत मिळत नाही आणि त्याला ती मज्जा पण येत नाही असं का झालं असेल?पदार्थ तेच पण आजीसारखी  चव मुळीच नाही . आजी आज या जगात नाही  पण तिच्या  सुरकुतलेल्या हातांनी बनवलेली लोणच्याची आठवण मनात ताजी आहे  .माझी रिकामी बरणी त्या लोणच्याची वाट पाहतेय आणि मन आजीची .....

Saturday, 21 March 2020

मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता...आज गवसली

आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आज काहीतरी वेगळा आभास होत होता. हा आभास पुढे येणाऱ्या आंधी चा होता की एक सुंदर जाणीवपूर्वक उगवलेली होती ह्याचा अंदाज येत नव्हता. मन थोडंसं खट्टू होत हा virus भारतात आला नसता तर आज आम्ही मुक्तागिरी ,अंजनगाव ला जाणार होतो .  माझ्या भाच्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करणार होतो. दोन दिवसांनी माझाही वाढदिवस येणार होता ,डोक्यात असंख्य प्लांनिंग तयार होते. पण ..... हे काय पहिल्यांदा हे सगळं रद्द करण्याचे कारणे काहीतरी वेगळीच होती.उठून गॅल्लरी मध्ये खुर्चीत जाऊन बसले बाहेर एकटक पाहत होते. गेल्या दोन -तीन दिवसांपासून काहीतरी वेगळंच घडतंय वातावरण भीतीने,आकुलतेने भरून गेलेलं आहे. का घडत असेल हे सगळं ????
आज मन कुठेतरी अंतर्मनात डोकावलं डोळे घट्ट मिटून घेतले ,एक मोठा  श्वास घेतला आणि खरंच जाणवलं अरे आज सगळीकडे शांतता जाणवतेय .अगदी आतमध्ये सुद्धा . समोरच्या रो -हाऊस मध्ये बरीच उंच उंच हिरवीगार झाडे आहेत ,पक्ष्यांची घरटे देखील आहेत. आज पहिल्यांदा इतक्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला आला होता. मैना ,पोपट ,कावळा ,कोकिळा आज अगदी स्पष्ट आवाज कानी पडत होता. हा आवाज रोज असतो कि आजच आला ???कदाचित रोजच होता पण गाड्यांच्या आवाजाखाली विरून जात होता. बोगनवेलची रंगीत फुले झाडावर दस्तक देत होती . आज रस्त्यावर पडलेली आणि वाळलेली झाडांची पाने देखील नावीन्य पूर्ण दिसत होती .  रोज  गॅल्लरीत येऊन सुद्धा   लक्ष कधी तिकडे गेलेच नाही .रोज कोणीतरी धावतंय ,गाड्या ऑफिस साठी पळताय ,मुले स्कूल साठी धावतंय फक्त धावणे आणि पळणे इतकेच मन वेधून घेत होते आणि ह्या घाईमध्ये नकळत मी सुद्धा पळतच तर होते.पण आज ही शांतता हविहवीशी वाटत होती. मला माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी हीच शांतता हवी होती . अरे....... !!!! आपण खूप दिवसांपासून काहीतरी शोधत होतो  ,काहीतरी हरवलं अस वाटतं होत हेच तर आहे ना ते !!!मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता !!! 

कोरोना virus हे फक्त प्रकृतीचे मानवजातीला  एक ओरडून सांगणे तर नसेल ना??अरे थांबा !!!किती ओरबाडून घेणार आहे माझ्याकडून ???तुमच्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ शक्ती या विश्वात आहे. या आधी प्रकृतीने ओरडून ओरडून सांगितले तरीही तिचा  आवाज तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखा केला ..आज तिने  गंभीर रूप धारण केलं हे तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी . आता तरी जागे व्हा !!!कुणालातरी घाबरा !!  
खरं तर एकदा हात जोडून प्रकृतीला धन्यवाद द्यायला पाहिजे कि वेळेतच आमचे  डोळे उघडले हे बरे झाले. आणि तन ,मन एकत्रित करून आज प्रकृतीची क्षमा मागायला हवी. आम्ही यापुढे कधीही  बेजबाबदार रीतीने प्रकृती सोबत  वागणार नाही .

Friday, 17 January 2020

आणि एक नवीन अनुभव गाठीस पडला ....


सक्षमचे (वय वर्षे ५.९)होमस्कूलिंग करतांना एक एक नवीन अनुभव गाठीस पडत होता हे नक्कीच . पण समोर वेगवेगळे प्रश्न उभे ठाकत होते. आम्ही घरीच वेगवेगळ्या गोष्टी पडताळून बघतो आणि खरचं रोज  काहीतरी नवीन सापडतं शिकायला.त्याला शिकण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हापासून सक्षमची विचार करण्याची त्रिज्या  बरीच रुंदावलेली आहे. कालचच एक उदाहरण ,आम्ही बाबांच्या USA वरून आलेल्या मित्रांसोबत  "तानाजी"  चित्रपट बघायला गेलो होतो. २ आठवड्यापूर्वी आम्ही कोंढाण्याची (सिंहगडाची )इत्यंभूत माहिती काढून त्याचा फडशा पाडला  होता . सिंहगडचे मॉडेल बनवून तानाजी मालुसरे कसे लढले असतील ,उदयभान राजा ला मारून शिवाजी महाराजांचे उदगार "गड  आला पण सिंह गेला "हे आम्ही आमच्या थिएटर मध्ये action करून करून रंगवले  होते .चित्रपट बघून आल्यानंतर त्याने त्याची केलेली समीक्षा अतिशय कौतुकास्पद होती. USA वाल्या काकांना आपल्या शब्दात कळवली देखील. "तानाजी हे  उदयभान राजाला आधी भेटलेच नव्हते ",शिवाजी राजे गडावर जातच नाही  ते त्यांच्या दरबारात हे उदगार काढतात  ","उदयभान राजाला शेलार मामानी मारले होते ना ?"  मग चित्रपटात चुकीचे का दाखवले? हे त्याने शिकलेल्या इतिहासात बसत नव्हते . चित्रपटामध्ये ट्विस्ट टाकायला त्यांनी असा दाखवलंय हे समजावणं आम्हाला थोडं अवघड गेलं. पण एक correction तो करायला विसरला नाही त्यांचे नाव तानाजी नसून तान्हाजी आहे. एक गोष्ट वाखाण्याजोगी ती म्हणजे तो इतिहासातील  कुठल्याच व्यक्तीचे  नाव एकेरी न घेता आदरपूर्वक उच्चरतो . त्याच्या मनात इतिहासाबद्दल आदर आणि त्याचबरोबर आवड निर्माण झालीय . हीच काय ती माझी कमाई . आता माझं शिकवण्याचं  काम खूप सोपं झालं  आहे . तोच स्वतः उत्सुक असतो इतिहासातील नवीन व्यक्ती बद्दल  जाणून घेण्यासाठी . मी फक्त कसं  शिकायचं एवढंच शिकवलं काय काय शिकायचं हे त्याच तो शोधतो आहे . अजून काय हवं नाही का???हा आमचा पालक म्हणून  नवीन गिरवेलेला धडा . 


काही नवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी  मी कमी पडते आहे असं मला जाणवतं तेव्हा आम्ही बाहेर कुठे तरी learning center शोधत असतो.असाच एक   आमच्यासाठी अवघड, कठीण अनुभव. स्कूल ऑफ लाईफ एक alternative स्कूल ज्या  मध्ये सक्षम हल्ली performing arts शिकायला दिवसातील २ तास  जातोय. स्कूल आणि शिक्षक ,शिकवण्याची पद्धत एकदम  उत्तम ह्यामध्ये कुठलाही वाद नाही. पण तो जायला तयार होत नव्हता ,सोडायला गेल्यानंतर खूप रडून रडून लाल होत असे. इथे त्याचे ओळखीचे मित्र कोणीही नव्हते . नवीन स्कूल ह्या वातावरणाशी जुळवून घेणे त्याला जमत नव्हते. आमच्यासाठी देखील हा पहिलाच अनुभव होता . त्याला रडवलेलं सोडून माझा पाय तिथून निघत नव्हता  पण हे करणं त्याच्यासाठी योग्यच आहे हे ठाऊक होत.त्याचे रडणे थांबावे म्हणून मी मैत्रीणीना विचारायाला सुरवात गेली,google करून वेगवेगळे उत्तरे शोधायला सुरवात केली. त्याला रोज अमिश दाखवून पाठवायला लागले. त्याचे रडणे कमी होत नव्हते . रोज प्रॉमिस करून आज तू रडू नकोस अशी विनवणी करू लागले . शेवटी अर्चना मॅम founder ऑफ स्कूल ऑफ लाईफ ,होमस्कूल mother ,आमच्यासाठी inspiring असे व्यक्तिमत्व  त्यांच्याशी बोलायचं ठरवले . माझा पहिला व्हाट्स अँप मॅसेज "mam need some tips to stop saksham from crying  ". ह्यावर त्यांचे सुंदर उत्तर "why you want to stop him from crying ,he is just  expressing his emotions for  unknown environment ,unknown people" . हे हृदयाला भिडणारे उत्तर मला खरंच रिलॅक्स करणार होतं . त्याच्या भावनांचा आदर करायला हवा  हो ... रडणे  हि सुद्धा त्याची एक भावना असू शकते हे नव्याने कळले. आता मात्र माझे  अमिश दाखवणे बंद झाले आहे. आता रडून घे थोडं हरकत नाही ... पण स्वतःला adjust करायचा प्रयत्न कर हे मी त्याला समजावते . सकारात्मक फरक पडतोय सक्षम मध्ये पण त्याला ह्या गोष्टींमध्ये रुळायला मुरायला वेळ लागेल हे नक्कीच . हे सुद्धा माझ्यासाठी एक लर्निंगच आहे . 
(special Thanks to all Staff from school of Life ).    

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...