Saturday, 18 July 2020

होमस्कूलिंग आणि परीक्षा

जेव्हा सक्षमच्या सगळ्या सोसायटी मधल्या मित्रांची परीक्षा असते तो काळ म्हणजे सगळीकडे शुकशुकाट पसरलेला असतो. एक शांतता सगळीकडे विखुरलेली  असते .कोपऱ्यात कुठेतरी बॅट , बॉल ,स्टंप धूळ खात पडलेले असतात ज्या सायकल वर पायडल मारून शर्यत लावली जाते ती सायकल पार्किंग मध्ये निपचित पडलेली असते .सोसायटी चे प्ले ग्राउंड एकदम सामसूम झालेले असते रोज मुलांच्या होणाऱ्या  किलबिलाटाची जागा  आता फक्त झोक्याच्या हवेने हलणाऱ्या आवाजाने घेतलेली असते. समस्त आई वर्ग हा वेगळ्या काळजीत गढलेला दिसतो सकाळचे मॉर्निंग walk असेल किंवा भाजी घ्यायला आलेला आई लोकांचा गोळका  असेल समस्त चिंता वाहून ह्या वावरत असतात त्यासाठी एकच असलेलं कारण म्हणजे सगळ्या मुलांची  नुकतीच  सुरु झालेली  परीक्षा. परीक्षेच्या काळामध्ये घरचे वातावरण बदललेले असते ,टेलिव्हिजन च्या आवडत्या सिरीयलस  आजी डोळे बारीक करून ,हळू आवाजात ऐकत असते ,आई काम लवकर उरकून रिविजन घेण्यात मग्न असते ,बाबा आपला आपला चहा स्वतः करून घेत असतात कारण काहीतरी वेगळं घडणार असतं  किंवा त्याला नको तेवढं महत्व देऊन आपण ओझं वाहत असतो. 
होमस्कूलिंग आणि परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास मी विविध पैलू उलगडून करायचा प्रयत्न केला.मला सापडलेले उत्तर मांडण्याचा प्रयत्न सक्षम च्या  निरागस विश्वातून करते आहे .  ते पैलू प्रश्न  स्वरूपाने समोर आले ते असे ... एवढे सुंदर ,वेगवेगळे आयुष्य बाहेर बघायला मिळत असताना आपण का ४ रूम च्या बंदिस्त कप्प्यामध्ये शिकावं ?आणि तेही केवळ परीक्षेसाठी त्यापेक्षा जगातील निरनिराळे  अनुभव घ्यायचे,स्वतः अनुभवायचे आणि आपले इवलुएशन करायचे असे झाले तर ?शिक्षण म्हणजे फक्त शाळा हे समीकरण थोडं बाजूला ठेऊन निसर्गात जाऊन शिकलो तर ? 
आजूबाजूचेच उदाहरण घ्या ना शाळा आहे म्हणून आपण कितीतरी परिवारातील कार्यक्रम जगायचे सोडून देतो पण परीक्षा पेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते ४ वेगवेगळया स्वभाव असलेल्या लोकांना भेटणं  फक्त परीक्षा हे आयुष्य जगण्याचे अंतिम ध्येय असूच शकत नाही त्यापेक्षा सहज कुठल्याही वातावरणात सामावून जाणे हा धडा आपल्यासाठी जास्त महतवाचा असू  शकतो. जिथे जाऊ तिथल्या प्रकृती  सोबत  एकरूप होणे हा बदल स्वतःमध्ये घडवणे हि एक परीक्षा असू  शकते.  ह्याबाबतीत शहरातल्या मुलांपेक्षा मी छोट्या गावतल्या मुलांना खूप नशीबवान समजते कारण पुस्तकी म्हणजे कोणीतरी आधीच लिहून ठेवलेल्या एखाद्या धड्यापेक्षा स्वतः काहीतरी बनवून गिरवलेला ,अजमावलेला धडा हा जास्त आनंददायी असू शकतो.एखाद्या पहिलीतल्या मुलाला जस झाड दाखून पान ,फळ ,फुल हे त्याचे विविध अंग आहे आणि परीक्षेत ते विचारतात म्हणून खूप महत्वाचे आहे असे सांगून  फक्त डोळ्यासमोर काही मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे त्या मुलासाठी अंतिम ध्येय असू शकते ह्याच्या विरुद्ध  त्यापेक्षा बी पेरल्यापासून झाड मोठं होई  पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवने आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले अंतिम ध्येय आहे हे शिक्षण एक सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मदत करते ज्याची आता सगळ्यात जास्त गरज आहे. शाळेची परीक्षा आणि जीवनाची परीक्षा ह्यामध्ये किती हा दुरावा . जीवनात पहिले अनुभव येतात ,त्याबद्दलचे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात  आणि मग काय वाईट ,काय चांगले हे पडताळून बघून मग योग्य ते निर्णय घ्यावे  लागतात. पण शाळेच्या परीक्षेत मात्र ह्याच्या विरुद्ध ,सर्वात आधी वेगवेगळ्या  विषयाचे ज्ञान डोक्यात  फिट्ट बसवायचे मग पुन्हा त्याला आठवून कागदावर उतरवायचे आणि त्यावरून मूल्यमापन ठरवायचे. 
दोन अनुभव मला ह्यामध्ये नमूद करावेसे वाटतात पहिला  हा माझा स्वतःचा आहे ,इतक्यात परीक्षा म्हणजे काय ह्यावर घरात बरेच संवाद होत होते . मी सक्षम पुढे मांडलेला प्रश्न.... आपण  तुझी परीक्षा घ्यायची का ?इतक्यातच तू सायकल चालवायला शिकलास ना मग आपण एक टेस्ट घेऊया . मला निरुत्तर करणारे त्याचे उत्तर ... "नको इतक्यात ..अजून मला बरेच शिकायचे आहे ... मला परीक्षा कधी द्यायची हे मी ठरवेल आणि तुला सांगेल  !!". होमस्कूलिंग मध्ये परीक्षा देण्याचा हक्क हा मुलांकडे अबाधित राहतो.मला माझ्यामध्ये असलेल्या क्षमता तपासून बघायच्या आहेत असं जेव्हा तो ठरवेल  तेव्हाच इवलुएशन करायचं  हे होमस्कूलिंग मध्ये जमतं .

 


दुसरा अनुभव म्हणजे सुप्रिया जोशी ,मुंबई  एक होमस्कूलर आई दोन्ही मुली शाळेत जात असतांना ,result डे च्या दिवशी सगळ्या मैत्रिणींच्या आई बेंच वर बसून पेपर बघत असत ,५ मार्क कुठे कमी पडले ह्याची सविस्तर चर्चा शिक्षकांसोबत  होत असे ,पण सुप्रिया ताई मात्र ती गुंडाळी हातात घेऊन घरी परत येत असे ,मालविका (सुप्रिया ताईंची  मोठी मुलगी )नेहमी म्हणायची आई तू कधीच टीचर सोबत बोलत नाही ??असे का ??ते बरं दिसत नाही ??तू निदान बेंच वर बसायचं नाटक  तरी करत जा. तेव्हा त्यांचे मालविका साठी सुंदर उत्तर "बेटा ही कागदाची गुंडाळी तुझे भविष्य ठरवू शकत नाही.तुझ्यामध्ये असणाऱ्या स्किल्स ह्या मी ओळखते  ".आज मालविका शाळेत न जाता कुठल्याही डिग्री शिवाय USA च्या MIT युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहे. फक्त तिने स्वतःसाठी एक पोर्टफोलिओ बनवला प्रत्येक  वर्षी तिने आत्मसात केलेल्या तिच्या आवडीच्या क्षेत्रातल्या निरनिराळ्या स्किल्स त्यामध्ये नमूद केल्या . तिचे मूल्यमापन तिनेच केले . कुठलीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी हे तुमच्यामधील स्किल्स ला मार्क देऊन मोजू शकत नाही. 

ए जिंदगी कब तक इन अंको से भरी कागज पर हमे आजमाते रहोगी?
जो अंकपत्र पाने के  लिये पुरी जिंदगी मेहनत कि 
वही कागज वास्तविक जीवन  में  पर्ची बन कर रह जाता  है
 वास्तविक रूप मे  सामने आने  वाले सवाल कुछ और हि होते है  
कब तक हम  ऐसेही  झुलते रहेंगे कागज  और असली एहसास  के बीच 
कागज कि कमाई और एहसास  कि रुहाई अब सिखा दे एक साथ में 

Wednesday, 17 June 2020

माझी आई गेलीय सात समुद्र पार

कविता वाचण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. माझ्या बघण्यातील सुखवस्तू कुटुंब ,आई बाबा दोघेही आय टी कंपनी मध्ये नोकरीला . अतिशय गोंडस ,निरपराध ,४ वर्षाची मुलगी खूप गुणी . पण आई सात समुद्र पार गेल्यापासून सगळं नूरच बदलला ,तिच्या भावनांना  न्याय देण्याचा प्रयत्न कवितेतून केला आहे

ए आई तू खूप आनंदी होतीस ,जेव्हा तुला लंडनला जायचं होतं 
तुझ्या करिअरच आभाळ तुला सात समुद्र पार बोलावत होत 
माझ्या पंखांमध्ये बळ असतं तर घेऊन आले असते परत तुला  
नको ते खेळणे ,नको ते कपडे ,तुझ्या मिठीत येऊ दे एकदा मला 
मोबाईल वरून रोज व्हीओडीओ कॉल करते ,बोल बोल म्हणतेस 
रोज काहीतरी आमिष दाखवून, "लवकर येते पिलू" म्हणून सांगतेस
खरंच आलीस तरी वेगळं काही जाणवणार  नाही आता 
मला आजीकडे सोपवून रोज ऑफिसला जातेस ,त्याचा नाही राग 
आजी तर मला आवडतेच ,पण मला हवास वाटतो तू दिलेला घास 
सगळे खेळणे आहे माझ्याजवळ ,पण तरी हेवा वाटतो त्या कामवालीच्या पोराचा 
काहीच नाहीय खेळायला ,पण माय माय म्हणताच साद  येतो आईचा 
मी रडेल म्हणून न सांगताच निघून गेलीस ,आजीनेच समजूत माझी काढली 
रोज निदान संध्याकाळी येतेस  म्हणून दिवस तरी निघून जायचा
आता तूच सांग संध्याकाळचा एकटेपणा ,घालवायचा  तरी कसा ? 
रात्र तर मला नकोशीच झालीय ,स्वप्नातील परी पण खोटी वाटायला लागलीय 
एकदा अस वाटत येऊनच बघावं लंडनला ,मला सोडून जावंच कस वाटलं तुला? 
छोट्या छोट्या गोष्टींवरून आता खूप रडायला येत ,सगळाच खेळ  निरस होऊन जातो 
बाबा पण सारखा कामच करतो ,दया आली  माझी की थोडावेळ जवळ घेऊन बसतो 

एक प्रश्न विचारावासा वाटतो ग तुला ? असच सोडून जायचं होत तर 
या जगात आणलास कशाला ???

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला 
किती छान सजवयलय या निर्जीव जीवाला
कौतुक करता करता तोंड  थकत नाही माझं 
डोक्यावर मात्र वाहतोय इ एम आय  च ओझं  
पार्किंग मध्ये खाली कार उभी आहे माझी ऐटीत 
पैशाच्या या झाडाला वाढवतोय नात्यांच्या मातीत 
हवा उजेड भरपूर येतोय दार खिडक्यांमधून 
सुंदर दृश्य सुद्धा दिसत बघा बालकनीमधून 
आईबाबांचा मात्र  श्वास कोंडतोय या शांततेमधून 
ते मात्र जाणवत नाही या भौतिकतेच्या पडद्याआडून 
आईच देव देव आणि  मंदिर आता खूप लांब राहिलय 
चार भिंतीतच तीच सगळं विश्व येऊन थांबलय 
सगळंच घर कस आधुनिकतेनी भरभरून  नटलंय 
आईने जपून ठेवलेली  संस्कृती  उंबरठयावर आलीय 
गावी घरी आलेला पाहूणा ढेकर देऊन जायचा 
तेव्हा समाधानाने बाबांचा चेहरा उजळून निघायचा 
दर रविवारी घेऊन जातो सगळ्यांना  महागड्या हॉटेलला 
तिच्या हातची प्रेमळ चव नाहीच येत त्या जेवणाला 
त्यांचा मुळीच आरोप नाही माझ्या या घराला 
पण खरंच मी पात्र आहे या कौतुकाला?

मृत्यू ...

माणसाचं काय आयुष्य असतं??
 
ना जन्म स्वतःच्या हातात आहे ना मरण
कसा हा प्रकृतीचा अजब गजब नियम
चालता फिरता, प्रवासाचं अचानक थांबणं
काल नवीन कपड्यात बघितलेल्या व्यक्तीला
आज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नेणं

चार लोक उचलून नेतात  त्या अबोल देहास
रडण्याचे, हुंद्क्याचे आवाज चिरती आसमंतास
थोडी दूरपर्यंत सोबत हि लोकांच्या गर्दीची
पुढच्या प्रवासाची  वाट मलाच माझी ठरवायची 
लाकडावर ठेवलेल्या शरीराला सोबत न मिळे कुणाची

घर ,दार ,नाते,पैसा सगळे  जिवंतपणाचे खेळ हे
आज यातले काहीच सोबत नाही घेता आले
देहाला जळताना पाहून शांत सगळे उभे राहिले
आज मध्ये अडवायला सुद्धा कोणीच नाही आले
आज खरं जीवनाचे दर्शन मला झाले

आयष्याच्या गणिताचा अंत हा शून्यातच झाला
बेरीज वजाबाकी करून जीव हा पुरता थकला
उभ्या जीवनात बहराला माझ्या जरी निशिगंध
तरी शेवटी ललाटी लिहलेला असा हा अंत 
काय म्हणावे याला हा शेवट कि आहे आरंभ

  ज्या देहाच्या मागे धावलो तोच नश्वर होता
मला एक दिवस नेणारा मृत्यू हाच शाश्वत होता
आत्म तत्व सोडून देहाला सत्य समजणारा माझा मूर्खपणा होता !!

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

हळुवार तुझी चाहूल का दरवळतो मज उर ......

अजून चार दिवस बाकी होतेआपल्या  भेटीला
हे कसे समजवावे या व्याकुळ  वेड्या मनाला
पाहुण्यांच्या गर्दी मधूनही मला टिपणारी नजर तुझी
सुंदर तयार झाल्यावर हसून मिळालेली दाद नजरेची

 स्पर्शानेच  व्यक्त व्हावे असं काही जरुरी नाही
डोळ्यांची भाषा बोलायला  शब्दांची गरज  नाही
आजूबाजूला असणारा तुझा भास देखील आहे पुरेसा
तुझ्या असण्याने दिवसभरचा थकवा होतो  नाहीसा

तू केलेली तारीफ मला नकळत वेडावून सोडते
तुझ्या तोंडून परत परत तेच ऐकावेसे वाटते
गोऱ्या गालावर सगळी लाली एकवटून जाते
आधीच लाल झालेली माझी कळी अधिकच खुलते

झोपेत असताना तुला बघण्याचे सुखच वेगळे आहे
तुझ्या स्वप्नात येण्याची मला परवानगी हवी आहे
तू स्वप्न पाहावे आणि मी त्यामध्ये रंग भरावे
पहाटे जाग  येताच समोरही तू मलाच बघावे 

तुझ्यासोबत मिरवण्याचा आनंदच वेगळा आहे
हातात हात घालून चालतांना आसमान ठेंगणे आहे
 प्राजक्ताचा सडा पडावा  ,आणि मातीला सुगंध सुटावा
तसाच तुझा हळुवार स्पर्श मला शहारून सोडावा 

एक गमंत सांगू तुला

एक गमंत सांगू तुला ...खरंच खूप आवडतोस तू मला

हल्ली मोबाइल -लॅपटॉप मधून नसते सवड तुला
इनबॉक्स ला मिळालाय माझ्या वाटचा वेळ सगळा 
आपल्या वायरलेस प्रेमाचा रंगच मुळी  निराळा 
 तरी तू प्रेमाचा टाकलेला एक कटाक्ष पुरा झाला

एक गमंत सांगू तुला... खरंच खूप आवडतोस तू मला

मुद्दाम माझ्यासाठी असं काही खरेदी करीत  नाहीस
पाडव्याची साडी संक्राती ला घेतोस हे काही थोडे नाही
नाही घेऊन गेलास तरी  चालेल रोज बागेत फिरायला
दोघात एकच प्लेट भेळ ऑर्डर करतोस ना खायला

म्हणून ...... खरंच खूप आवडतोस तू मला

पावसामध्ये दोघांनी चिंब भिजावं अशी अपेक्षा नाही
लॉंग ड्राईव्ह ला नेणारा तू काही फिल्मी नवरा नाही 
पावसावरचं गाणं लागतोस जेव्हा तू गुणगुणायला 
स्वतःहून सर्दीचा काढा  आणून देतोस  प्यायला

म्हणून ..... खरंच खूप आवडतोस तू मला

घराच्या दारावर तुझ्या नावाची असेल जरी पाटी
कवितेतील शब्द माझे असतील पण लिहिले  तुझ्यासाठी
अर्थ आलाय तू येण्यामुळे माझ्या निःशब्द भावनेला
अजून काय सांगू ..... खरंच तू खूप आवड्तोस मला

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...