कविता वाचण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. माझ्या बघण्यातील सुखवस्तू कुटुंब ,आई बाबा दोघेही आय टी कंपनी मध्ये नोकरीला . अतिशय गोंडस ,निरपराध ,४ वर्षाची मुलगी खूप गुणी . पण आई सात समुद्र पार गेल्यापासून सगळं नूरच बदलला ,तिच्या भावनांना न्याय देण्याचा प्रयत्न कवितेतून केला आहे
ए आई तू खूप आनंदी होतीस ,जेव्हा तुला लंडनला जायचं होतं
तुझ्या करिअरच आभाळ तुला सात समुद्र पार बोलावत होत
माझ्या पंखांमध्ये बळ असतं तर घेऊन आले असते परत तुला
नको ते खेळणे ,नको ते कपडे ,तुझ्या मिठीत येऊ दे एकदा मला
मोबाईल वरून रोज व्हीओडीओ कॉल करते ,बोल बोल म्हणतेस
रोज काहीतरी आमिष दाखवून, "लवकर येते पिलू" म्हणून सांगतेस
खरंच आलीस तरी वेगळं काही जाणवणार नाही आता
मला आजीकडे सोपवून रोज ऑफिसला जातेस ,त्याचा नाही राग
आजी तर मला आवडतेच ,पण मला हवास वाटतो तू दिलेला घास
सगळे खेळणे आहे माझ्याजवळ ,पण तरी हेवा वाटतो त्या कामवालीच्या पोराचा
काहीच नाहीय खेळायला ,पण माय माय म्हणताच साद येतो आईचा
मी रडेल म्हणून न सांगताच निघून गेलीस ,आजीनेच समजूत माझी काढली
रोज निदान संध्याकाळी येतेस म्हणून दिवस तरी निघून जायचा
आता तूच सांग संध्याकाळचा एकटेपणा ,घालवायचा तरी कसा ?
रात्र तर मला नकोशीच झालीय ,स्वप्नातील परी पण खोटी वाटायला लागलीय
एकदा अस वाटत येऊनच बघावं लंडनला ,मला सोडून जावंच कस वाटलं तुला?
छोट्या छोट्या गोष्टींवरून आता खूप रडायला येत ,सगळाच खेळ निरस होऊन जातो
बाबा पण सारखा कामच करतो ,दया आली माझी की थोडावेळ जवळ घेऊन बसतो
एक प्रश्न विचारावासा वाटतो ग तुला ? असच सोडून जायचं होत तर
या जगात आणलास कशाला ???